कोवॅक्सिन लस २८ दिवस राहणार सुरक्षित

करोनापासून बचावासाठी दिली जात असलेली हैद्राबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस आता खराब होण्याची शक्यता कमी झाली असून ही लस २८ दिवसांपर्यंत सुरक्षित राहणार आहे. भारत बायोटेकने लसीच्या साठवणूक प्रक्रियेत काही महत्वाचे बदल केल्यामुळे हे शक्य झाले असून २८ दिवसापर्यंत ही लस वापरता येणार आहे. यापूर्वी लसीची बाटली फोडल्यावर चार तासांच्या आत संपली नाही तर लस वाया जात होती. नव्या बदलामुळे लसीची बाटली फोडल्यावर सुद्धा २८ दिवस ती वापरता येणार आहे. फक्त या काळात लस २ ते ८ डिग्री तापमानात ठेवावी लागणार आहे.

यामुळे लसीचे डोस वाया जाणार नाहीत. सध्या कोवीशिल्ड आणि कोवॅक्सिन अश्या दोन प्रकारच्या कोविड लसी देशात दिल्या जात आहेत. कोवॅक्सिनच्या एका बाटली मध्ये २० डोस आहेत तर कोविशिल्डच्या एका बाटलीत १० डोस आहेत. आयसीएमआर आणि पुण्याच्या एनआयव्ही मधील वैज्ञानिकाच्या सहकार्याने कोवॅक्सिन लस भारत बायोटेकने तयार केली आहे. देशात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लस ताबडतोब बाटली न संपल्यामुळे वाया जाण्याचे प्रमाण मोठे आहे. केंद्राने लस वाया घालवू नये असे आदेश पूर्वीच दिले आहेत. कारण त्यामुळे लसीची कमतरता भासतेच पण सरकारला मोठे नुकसान सोसावे लागते. त्यामुळे लस साठवणूक प्रकारात बदल करणे आवश्यक बनले होते. त्यासाठी मेहनत करून  मार्ग काढला गेला असल्याचे सांगितले जाते.

आजपर्यंत देशात १,४५,४१,४६७ जणांना कोवॅक्सिन लस दिली गेली आहे तर १४,०६,९५,६७१ जणांना कोवीशिल्ड दिली गेली आहे. लस वाया गेल्यामुळे ८० कोटींचे नुकसान सोसावे लागले असल्याचेही सांगितले जात आहे.