जखमी वाघिणीने एकहाती विजय मिळवला; पश्चिम बंगाल निकालावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया


मुंबई – संपूर्ण देशात एक नवा प्रकाश पश्चिम बंगालच्या विजयाची मशाल निर्माण करेल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मैदानात उतरुन एक स्त्री, एक जखमी वाघीण एकटी लढत होती, त्यांच्या पक्षाला उद्ध्वस्त केले, नेत्यांना तोडले, केंद्रीय यंत्रणांचा दवाब आणला. आपलेच लोक विरोधात उभे असतानाही बंगालची वाघीण मागे हटली नाही, लढत राहिली आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. संपूर्ण देश आणि राजकारणासाठी हे प्रेरणादायी असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले आहे.

विजय आणि पराजय निवडणुकीत होत असतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपने खूप मेहनत घेतली. भाजपने सर्वांना काम लावले होते, पण तरीही ममतादीदी भारी पडल्या. ममता जमिनीशी जोडलेल्या असून जनतेवर त्यांचा आजही प्रभाव आहे, यावरुन स्पष्ट झाले आहे. तुम्ही सभा घेतल्या, रॅली काढल्या, पैसा ओतला, हे दिसत आहे, तरीही पश्चिम बंगालची लेक ममता बॅनर्जी यांच्याकडे लोकांनी सत्तेची कमान सोपवली आहे. हा लोकशाहीचा खूप मोठा विजय असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

या निवडणुकीत मोदी, अमित शहा आणि जे पी नड्डा यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. देशात कोरोनाचे सकंट असतानाही प्रोटोकॉल तोडून रोड शो, रॅली, शक्तीप्रदर्शन होत होते. कोरोनाशी सगळा देश लढत असताना तिथे ममतांचा पराभव करण्यासाठी भाजप लढत होते. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या बदल्यात तुम्ही कोरोना दिल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

पुन्हा एकदा दिल्लीतून येऊन कोणत्याही राज्यात दादागिरी सहन केली जाऊ शकत नाही हे ममता बॅनर्जींनी करुन दाखवले आहे. मग ते महाराष्ट्र असो, दिल्ली असो किंवा मग पश्चिम बंगाल असो. देशाचे राजकारण तेथील जनता, प्रादेशिक पक्ष ठरवणार हा संदेश गेल्याचे ते म्हणाले.

कोरोनाची लढाई सोडून प्रधानमंत्री मोदींनी पश्चिम बंगालमध्ये व्यस्त राहणे योग्य नव्हते, असे मला वाटते. पक्ष लढत असतो, पण जेव्हा पंतप्रधान उतरुनही पराभव होतो, तेव्हा त्याचे खापर त्यांच्यावरच असते. हे देशासाठी ठीक नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

कोणताही बदल महाराष्ट्राच्या राजकारणात होणार नाही. भाजपचा पश्चिम बंगालमध्ये खूप मोठा विजय होईल आणि महाराष्ट्रात भूकंप येईल अशी अफवा पसरवली जात होती. पण असे काहीही झालेले नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र भावनेने एकमेकांशी जोडलेला आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र नेहमी राष्ट्रहितासाठी लढले आहेत. यापुढेही आम्ही सोबत असू. ममता बॅनर्जींच्या विजयावर उद्धव ठाकरे यांनीही आनंद व्यक्त केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.