राजकीय रणनीतीकार म्हणून राजकारणाला प्रशांत किशोर यांचा रामराम


नवी दिल्ली – तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद करत असतानाच यामध्ये मोलाचा वाटा असणारे ममता बॅनर्जींचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी या विजयानंतर मोठी घोषणा केली. राजकीय रणनीतीकार म्हणून आपण निवृत्ती घेत राजकारणाला प्रशांत किशोर यांनी रामराम ठोकला आहे. त्यांनी ही घोषणा एनडीटीव्हीशी बोलताना केली आहे.

भाजप दोन अंकी आकडा पार करु शकणार नाही, असे भाकीत प्रशांत किशोर यांनी वर्तवले होते. जर तीन अंकी आकडा भाजपने ओलांडला तर आपण संन्यास घेऊ, असे त्यांनी म्हटले होते. पण आपले भाकीत खरे ठरल्यानंतरही ते संन्यास घेत असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यावर बोलताना त्यांनी आपल्याला संन्यास घ्यायचा होता, त्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होतो. पश्चिम बंगालच्या निमित्ताने ही संधी मिळाल्याचे ते म्हणाले.

मला यातून बाहेर पडायचे आहे. माझी राजकीय रणनीतीकार म्हणून काम करण्याची इच्छा नसल्याचे प्रशांत किशोर यांनी एनडीटीव्हीला सांगितले आहे. इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीमधून (I-PAC) आपण बाहेर पडत असल्याचे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे. याची सुरुवात प्रशांत किशोर यांनीच केली होती. तिथे अनेक हुशार लोक असून ते योगदान देतील, पण मी संन्यास घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भाजप १०० जागा जिंकेल सांगत संन्यास घेण्याची मागणी करुन ट्रोल करणाऱ्यांना मला सांगायचे आहे की, आमचा विजय होत असतानाही आणि भाजप १०० च्या पुढे जाऊ शकलेली नसतानाही मी बाहेर पडत असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आय़ोगाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक आयोग भाजपचा विस्तारित भाग असल्याप्रमाणे काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.