वॉशिंग्टन पोस्टमधून मोदींवर निशाणा; निवडणूक निकालानंतर मोदींची लाट ओसरल्याचे सूचित झाले


वॉशिंग्टन – आज दिवसभरात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. ज्यामध्ये भाजपला पश्चिम बंगालमध्ये मोठा झटका बसला असून तृणमूल काँग्रेसने २०० हून जास्त जागांवर विजय मिळवला आहे. तसेच, केरळ आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये देखील भाजपला फारशी चमक दाखवता आलेली नाही.

अमेरिकन वृत्तपत्र असलेल्या वॉशिंग्टन पोस्टने या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. कोरोनाचा सरवाधिक फटका बसलेला देश भारत ठरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभा घेऊन चुकीचा संदेश दिला. त्यांच्यावर याबद्दल अनेक तज्ज्ञांनी टीका देखील केली आहे. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा करावा लागलेला सामना हा या कोरोना काळात मोदींची लाट कमी झाल्याचेच सूचित करत असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.

भाजपच्या पश्चिम बंगालमध्ये जागा मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्या, तरी अब की बार २०० पार भाजपला जमलेले नाही. ममता बॅनर्जी यांचेच सरकार पुन्हा एकदा येणार असल्यामुळे भाजपच्या अनेक दिग्गजांनी केलेला प्रचार पक्षाच्या कामी न आल्याचेच दिसून येत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार मेट्रो मॅन इ. श्रीधरन यांना करण्याचा डावही भाजपला केरळमध्ये विजय मिळवून देऊ शकला नाही. तर तामिळनाडूमध्येही भाजपला फारशी प्रगती करता आलेली नाही. त्यामुळे कोरोना काळात प्रचंड चर्चा आणि प्रचार झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला आसाम आणि पुद्दुचेरी स्वत:कडेच राखण्यावर समाधान मानावे लागले आहे.

दरम्यान, वॉशिंग्टन पोस्टमध्ये यावरून मोदींवर चांगलेच तोंडसुख घेण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाची कमजोर आरोग्य व्यवस्था खिळखिळी झालेली असतानाच भारतात ४ राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात निवडणुका घेण्यात आल्या. त्यावर बऱ्याच तज्ज्ञांनी आक्षेप घेतला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने देखील निवडणूक काळात झालेल्या रुग्णसंख्या विस्फोटाला निवडणूक आयोग जबाबदार असल्याची टिप्पणी केल्याचे वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या महिन्याभरात अनेक मोठमोठ्या प्रचारसभा घेतल्या. पश्चिम बंगालमधील हजारो, लाखो लोकांनी या प्रचारसभांना उपस्थिती लावली होती. मोदींचा पक्ष असलेल्या भाजपचा एक महिला नेतृत्व करत असलेल्या पक्षासोबत सामना होता. पश्चिम बंगालमध्ये तब्बल ५० प्रचारसभा मोदी आणि त्यांचे गृहमंत्री अमित शहा यांनी घेतल्या. पण संध्याकाळपर्यंत हे स्पष्ट झाले होते की बंगालमध्ये मोदींच्या पक्षाचा पराभव झाला आहे आणि दक्षिण भारतातील इतर दोन राज्यांमध्ये देखील भाजप पराभवाच्या मार्गाला लागल्याचे देखील या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.