पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, ममता बॅनर्जींचा नंदीग्राममध्ये पराभव


नंदीग्राम : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये आपला गड राखत भाजपला धूळ चारली आहे. पण, नंदीग्राम मतदारसंघातून ममतादीदींना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुरुवातीला ममतादीदी जिंकल्या असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण, नंतर भाजपचे उमेदवार सुवेंद्र अधिकारी विजयी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. तृणमूल काँग्रेसने एकहाती सत्ता राखत 218 जागांवर आघाडीवर आहे. अद्यापही मतमोजणी सुरू आहे. तृणमूल काँग्रेसने 148 जागांवर विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात भाजपकडून सुवेंद्र अधिकारी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मतमोजणीच्या सुरुवातीपासून अधिकारी हे आघाडीवर होते. पण संध्याकाळी अचानक चित्र पालटले आणि ममतादीदींनी आघाडी घेतली. 1200 मतांनी ममतादीदींना विजयी घोषित करण्यात आले होते. ममतादीदी विजयी झाल्यामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते.

पण अंतिम निकालाअंती चित्रच पालटले. सुवेंद्र अधिकारी हे 1622 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले आहे. ममतादीदींच्या पराभवामुळे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. खुद्द ममता बॅनर्जी यांनी पराभव स्वीकारला आहे. ममता बॅनर्जींना पुन्हा मुख्यमंत्री होता येईल, पण पुढच्या सहा महिन्यात त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल, त्यासाठी टीएमसीच्या एका आमदाराला राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण बंगालमध्ये विधानपरिषद नसल्यामुळे विधानपरिषदेतून ममतादीदींना आमदार होता येणार नाही.