राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त


मुंबई: नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत राज्यात झपाट्याने वाढ सुरूच असली तरी आज निदान झालेल्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या ज्यास्त आहे. ही बाब पूर्ण राज्याला किंचिताच दिलासा आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत ६६ हजार १५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आज एकूण ६८ हजार ५३७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन होऊन घरी गेले आहेत. ही संख्या काल ६७ हजार ७५२ एवढी होती. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ६३ हजार ३०९ एवढी होती. कालच्या तुलनेत आज वाढ झाली असून हा फरक २ हजार ८५० एवढा आहे. त्याचबरोबर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ७० हजार ३०१ वर जाऊन पोहचली आहे.

राज्यात आज एकूण ७७१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या काल ९८५ एवढी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के एवढा असून राज्यात आज ६८ हजार ५३७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत राज्यात एकूण ३७ लाख ९९ हजार २६६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.६९ टक्क्यांवर आले आहे. ६ लाख ७० हजार ३०१ एवढी राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे.

दुसरीकडे पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी वाढली असून येथे राज्यात सर्वाधिक १ लाख ०४ हजार ५२९ एवढे रुग्ण आहेत. मुंबई महानगरपालिका हद्दीत हा आकडा ६७ हजार २५५ एवढा आहे.

ठाणे जिल्ह्यात सध्या ५६ हजार ९७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ८० हजार ०२८ एवढी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५२ हजार ९५४ आहे. तसेच अहमदनगरमध्ये २३ हजार १२४ आहे. औरंगाबादमध्ये १४ हजार ६४९, तर नांदेडमध्ये ही संख्या ९ हजार ३६० एवढी आहे.

तसेच जळगावमध्ये १३ हजार ३९३, तर रायगडमध्ये एकूण १३ हजार ९०९ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ७ हजार २४३, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजार ८०३ आहे.

धक्कादायक म्हणेज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ९३५ एवढी आहे.