काल दिवसभरात देशात दोन लाख 51 हजार 827 रुग्णांची कोरोनावर मात


नवी दिल्ली – लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यु सारख्या पर्यायांचा देशातील अनेक राज्यांनी वापर सुरू केला असला, तरी कोरोनाबाधितांची संख्या काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. काल दिवसभरात देशात तीन लाख 23 हजार 144 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे, तर 2771 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 28 लाख 82 हजार 204 एवढी झाली आहे. तर दिलासादायक बाब अशी की काल दिवसभरात दोन लाख 51 हजार 827 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

सोमवारपर्यंत देशात कोरोनाच्या एकूण 28 कोटी नऊ लाख 79 हजार 877 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सोमवारी एकाच दिवसात 16 लाख 58 हजार 700 चाचण्या घेण्यात आल्याचे आयसीएमआरने सांगितले आहे.

दूसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज राज्यात 48 हजार 700 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर 71 हजार 736 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण 36 लाख 01 हजार 796 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.92 टक्के झाले आहे. राज्यात एकूण 36 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज राज्यात एकूण 524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.05 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 65 हजार 284 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या 524 मृत्यूंपैकी 293 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 116 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 115मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.