ज्युलिओ रिबेरो यांच्या टीकेला फडणवीसांनी दिले उत्तर


मुंबई – राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्राच्या माध्यमातून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर पोहोचले होते.

यावरुन फडणवीसांवर ज्युलिओ रिबेरो यांनी टीका करताना सत्तेसाठी सैरभेर झाल्याचे म्हटले होते. त्यांनी ही टीका इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या लेखात केली होती. या टीकेला फडणवीसांनी देखील इंडियन एक्सप्रेसच्या माध्यमातून पत्र लिहित आपली बाजू मांडली आहे. मी काही जर चुकीचे केले असेल, तर मी पोलीस कॉन्स्टेबलची माफी मागताना मागे पुढे पाहणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपण ज्या भावना माझ्या मुख्यमंत्री कार्यकाळाबद्दल व्यक्त केल्या आहेत, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तुमचे हे शब्द मला भविष्यात प्रेरणा देत राहतील. मला यावेळी तुमच्याप्रती असणारा आदरही व्यक्त करायचा आहे. काही मुद्द्यांवर आपले मतांतर असू शकते, पण तुमच्या स्पष्टवक्तेपणा आणि वचबद्धतेने मला नेहमीच प्रभावित केले आहे.

तुमच्या लेखात व्यक्त केलेल्या मतांचा प्रतिकार करण्यासाठी हे पत्र मी लिहित नाही. कोणतीही रचनात्मक टीका मी योग्य पद्दतीने घेतो. महाविकास आघाडीने चुकीच्या गोष्टी पसरवल्या असून जो चुकीचा प्रचार केला आहे त्याबाबत मी तथ्य समोर आणण्यासाठी आणि वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी हे पत्र लिहित असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

सर्वात प्रथम मी आणि प्रवीण दरेकर एकही रेमडेसिविर भाजपसाठी खरेदी करणार नव्हतो. आम्ही एफडीएला लिहिलेल्या पत्रातही फक्त समनव्य घडवून आणत असून एफडीएने खरेदी करावी असा उल्लेख केला आहे. यामध्ये प्रशासकीय पातळीवर काही अडचण असल्यास आम्ही खरेदी करतो आणि सरकारला देतो असाही प्रस्ताव दिला.

उत्पादक कंपनीसोबत एफडीए मंत्र्यांचा प्रवीण दरेकर यांनी संवाद घडवून आणला. यासंबंधी एफडीएकडून त्या उत्पादक कंपनीला अधिकृत पत्र देत फक्त महाराष्ट्राला हा पुरवठा करण्यास सांगण्यात आल्यामुळे महाराष्ट्राशिवाय इतर कोणाला पुरवठा होण्याची शक्यता नव्हती. एफडीए मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीतही हा साठा राज्य सरकारसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत.

डीसीपी ऑफिसला मी का गेलो? कंपनीच्या एका संचालकाला मंत्र्याच्या ओएसडीने फोन करुन विरोधी पक्षनेत्याच्या सांगण्यावरुन तुम्ही रेमडेसिविर का देत आहात अशी विचारणा केली. तुम्ही फक्त सरकारच्या सांगण्यावरुन दिले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपण सरकारलाच रेमडेसिविर देत असून यासंबंधी एफडीए मंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती दिली.

एक एपीआय त्याच संध्याकाळी ट्रॅप करण्यासाठी साध्या कपड्यांमध्ये पोहोचले आणि रेमडेसिविरची मागणी केली. पण त्यांनी यासाठी नकार दिला. हा ट्रॅप फसल्यानंतर आठ ते १० पोलीस आणि एक अधिकारी त्यांच्या घरी गेले. त्यांनी त्यांचा फोन तपासला आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर माझी प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली आणि काहीतरी गौडबंगाल असल्याचे सांगितल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, सहपोलीस आयुक्तांना मी दोन ते तीन वेळा सगळा घटनाक्रम सांगितला. यावेळी मी पोलीस आयुक्तांनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण उत्तर मिळाले नाही. पण मी काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर ही नियोजित कारवाई असून सरकारमधील काही मंत्र्यांच्या सांगण्यावरुन करण्यात आल्याचा अंदाज मला आला. कायदेशीररित्या महाराष्ट्राला अत्यंत गरज असणाऱ्या औषधाचा पुरवठा करण्यासाठी तयार झालेल्या व्यक्तीचा असा छळ होऊ न देणे ही माझी नैतिक जबाबदारी होती.

या गोष्टीची वाच्यता न करताच मी पोहचलो नव्हतो. डीसीपींना मेसेज करुन मी यासंबंधी सांगितले होते. तसेच कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे डीसीपी ऑफिसला येत असल्याचे सांगितले होते. सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनाही मी याबाबतची माहिती दिली होती. ऑर्डरसंबंधी कोणतीही माहिती न सांगणाऱ्या पोलीस आयुक्तांकडे आम्ही एफडीए ऑर्डरची प्रत सोपवली. यावेळी आम्ही त्यांनी त्यांच्याकडे कंपनीने साठा केला आहे का? विचारणा करत केला असेल तर कारवाई करा, असेही सांगितले, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.

कंपनीच्या संचालकाला अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर सोडून दिले आणि गरज लागली तर पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल असे सांगितले. माजी मुख्यमंत्र्याने पोलीस स्टेशन किंवा डीसीपी कार्यालयात का जावे यावर वाद-विवाद होऊ शकतो. पण फक्त आमच्या सांगण्यावरुन राज्याच्या मदतीसाठी तयारी दर्शवली म्हणून एखाद्या व्यक्तीचा होणारा छळ रोखण्यासाठी मी जाणुबुजून हा निर्णय घेतल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

मी गृहमंत्री म्हणून कधीही तडजोड केली नाही. जर मी काही चुकीचे केले असेल तर पोलीस कॉन्स्टेबलची माफी मागतानाही मी मागे पुढे पाहणार नाही. मी तुमच्या मतांचा आदर करतो आणि भविष्यात अशा गोष्टी वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करेन, अशी हमी फडणवीसांनी दिली आहे.

आम्ही विरोधक म्हणून फक्त बोट दाखवत बसण्यापेक्षा राज्य संकटात असताना अशावेळी आपले स्त्रोत आणि संपर्क वापरत मदत केली पाहिजे, असे आम्हाला वाटते. हाच विचार करुन प्रवीण दरेकर दमणला गेले होते. मी कंपनीला परवानगी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली आणि अधिकाधिक रेमडेसिविर महाराष्ट्राला मिळाव्यात अशी अट घातली.

कोरोना संकटाच्या काळात आम्ही मनापासून केलेल्या प्रयत्नांचे असे राजकारण होईल वाटले नव्हते. महाविकास आघाडी आणि आपसारख्या पक्षाच्या समर्थकांनी खोटी आणि बनावट व्हिडीओ व बातम्या तयार करुन व्हायरल केल्या. मी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.