फोन टॅपिंग प्रकरणी सायबर सेल नोंदवणार सनदी अधिकारी रश्मी शुक्लांचा जबाब


मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी तपासाला आता वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या प्रकरणी आता सनदी अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले असून मुंबई सायबर पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना हे समन्स बजावले आहे. बुधवारी फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. हे समन्स रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी पाठवले असल्याची माहिती सध्या मिळत आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या टॉप सिक्रेट कागदपत्रांचा दाखला देत, महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदलीचे रॅकेट उघडकीस आणले होते. त्याचबरोबर फडणवीस यांनी असा आरोप केला होता की, अनेक पोलीस अधिकारी काही एजंट्स आणि राजकीय नेत्यांच्या मदतीने इच्छितस्थळी पोस्टिंग मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. तत्कालीन गुप्तचर आयुक्त रश्मी शुक्ला यांनी 25 ऑगस्ट 2020 रोजी एका गुप्त माहितीच्या आधारे अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडून परवानगी घेतल्यानंतर काही फोन टॅप केले होते, ज्यात अनेक खळबळजनक गोष्टी उघडकीस आल्या होत्या.

राज्याच्या पोलीस महासंचालकांनी रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांसह मुख्यमंत्र्यांनाही पाठवला होता. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसेच यासंदर्भात त्यांनी कारवाईची मागणी केली होती. जेव्हा फोन टॅपिंग झाले तेव्हा सीताराम कुंटे हे गृहविभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव होते. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांनी आपल्याकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली नसल्याचे कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. तसेच काही प्रकरणात फोन टॅपिंगची परवानगी एका नंबरची घेतली आणि दुसरेच नंबर टॅप केल्याचेही कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना मुख्य सचिवांनी सादर केलेल्या अहवालात दहशतवाद यासारखी कृती पकडण्यासाठी फोन टॅप करण्याची परवानगी दिल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे आणि रश्मी शुक्ला यांनी त्यासाठीच परवानगी मागितली, जी त्यांना देण्यात आली. परंतु भारतीय टेलीग्राफ कायद्यातील तरतुदींना डावलत रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या परवानगीचा गैरवापर केल्याचेही नमूद करण्यात आल्यामुळे याप्रकरणी आता रश्मी शुक्ला यांची चौकशी होणार आहे. त्यासंदर्भात मुंबई सायबर पोलिसांनी त्यांना समन्सही बजावले आहे.