रोज सकाळी उठून कांगावा करु नये; संजय राऊतांवर फडणवीसांची अप्रत्यक्ष टीका


मुंबई – देशाला सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून देशभरात आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यादरम्यान केंद्राकडे अनेक राज्ये मदत मागत असून यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविरचा पुरवठा करण्याची मागणी प्रामुख्याने करत आहेत. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्रातही मोठी समस्या असून मदतीवरुन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांचा उल्लेख न करता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना अप्रत्यक्ष टीका केली आहे. यावेळी केंद्राकडून राज्याला देण्यात आलेल्या मदतीची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रेमडेसिविरचा मोठा साठा महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मिळाला आहे. केंद्र सरकारने साडे सतराशे मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला दिला आहे.

जे बोलघेवडे लोक केंद्र सरकारवर सातत्याने बोलतात त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, इतर राज्यांपेक्षा दुप्पट कोटा केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिला आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर दिले आहेत. हवाई दलाच्या माध्यमातून आजही महाराष्ट्रात इतर गोष्टी पोहोचल्या असल्यामुळे जे कांगावेखोर आहेत, त्यांना माझी विनंती आहे, लोक दु:खात असून केंद्र सरकार मदत करत आहे. राज्याला केंद्राची मदत मिळत असून रोज सकाळी उठून कांगावा करु नये, अशी अप्रत्यक्ष टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

प्रत्येक पात्र नागरिकाला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करुन देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्येही जाहीर केले असल्यामुळे राज्यांवर याचा भार नाही. एखाद्या राज्याला वेगाने लसीकरण करायचे असल्यास बाजारात लस उपलब्ध आहेत. परंतू १०० टक्के भारतीयांकरिता केंद्र सरकारने व्यवस्था निर्माण केली असून लसीकरण होणार आहे. आता वेगवेगळी वक्तव्ये का केली जात आहेत. ट्विट डिलीट का केली जात आहेत याची मला कल्पना नाही. पण पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली असल्याचे सांगत फडणवीसांना राज्य सरकारवर निशाणा साधला.

पंतप्रधानांनी पहिल्याच दिवशी भूमिका स्पष्ट केली आहे. या गोष्टी त्याच्यात का येतात याची कल्पना नाही. यासंदर्भात किमान सगळे समजून घेतले पाहिजे आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता हवी. राज्य सरकारने आपले लसीकरण धोरण ठरवले पाहिजे. गर्दी होण्याची शक्यता आहे. म्हणून आपले धोरण ठरवले पाहिजे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.