ऑक्सिजनच्या कमी दाबामुळे दिल्लीत २० रुग्णांचा दुर्दैवी अंत


नवी दिल्ली – कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असलेल्या राजधानी दिल्लीत भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून, दिल्लीत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यूचे तांडवच सुरू आहे. कालच २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने दिल्ली हादरलेली असतानाच नाशिकच्या घटनेच्या स्मृती जाग्या करणारी घटना दिल्लीत घडली आहे. एकाच रुग्णालयातील २० रुग्णांचा ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे दिल्लीत मृत्यूचे तांडवच सुरू आहे. दिल्लीत २५ रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यामुळे जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये २० रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेला रुग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

महाराष्ट्रातील नाशिकमध्ये ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाला होता. असाच प्रकार जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये घडला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने शुक्रवारी रात्री २० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे डी.के. बालुजा यांनी सांगितले.

रुग्णालयात सध्या केवळ अर्धा तास पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक असल्याची माहितीही रुग्णालयाने दिली आहे. सध्या २०० रुग्ण उपचार घेत असून, वेळीच ऑक्सिजन मिळाला नाही, तर त्यांचे प्राण जाऊ शकतात अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.

दिल्लीतील सर्वच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनाचा तुटवडा असून, बात्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी ३५० रुग्णांचे धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ २५ मिनिटे पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा रुग्णालयात शिल्लक होता. दिल्ली सरकारला रुग्णालयाने एसओएस संदेश पाठवला. त्यानंतर दिल्ली सरकारकडून तातडीने एक ऑक्सिजन टँकर पाठवण्यात आला. रुग्णालयाला ८ हजार लिटर ऑक्सिजनची गरज असताना केवळ ५०० लिटरच ऑक्सिजन पुरवण्यात आले असून, केवळ १२ तासच पुरेल एवढा साठा असल्याचे रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक एससीएल गुप्ता यांनी म्हटल्यामुळे ३५० रुग्णांचे मरण तात्पुरते टळले अशीच भयावह स्थिती आहे.