अन् बैठकी दरम्यानच अरविंद केजरीवालांना मोदींनी फटकारले


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीने जागतिक उच्चांक गाठलेला असतानाच कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी मोदींकडे राजधानीत ऑक्सिनजचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मदत मागितली. तसेच अनेक पर्यायही सुचवले. पण नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यात सुरु असलेल्या चर्चेचे टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण होत असल्यामुळे वाद निर्माण झाला.

अरविंद केजरीवाल कोरोनासंबंधी राष्ट्रीय योजना असेल तर केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे त्यादृष्टीने काम करतील, असे सांगत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल आपले म्हणणे मांडत असतानाच त्यांना रोखले आणि फटकारले.

मोदी म्हणाले की, अशा अंतर्गत बैठकीचं लाईव्ह प्रक्षेपण करणे आपली परंपरा आणि प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. हे योग्य नाही. याचे आपल्याला नेहमी पालन केलं पाहिजे. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी खेद व्यक्त करत पुढच्या वेळी हे लक्षात ठेवू असे सांगितलं. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपले म्हणणे पूर्ण करत आपण काही चुकीचे केले असेल तर माफ करावे सांगत माफी मागितली. त्यांनी यावेळी मोदींना आपण दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल, असे आश्वासन दिले.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडूतील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सहभाग घेतला.

दरम्यान ऑक्सिजन प्लांटचा ताबा लष्कराच्या हाती देण्याची सूचना अरविंद केजरीवाल यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी यावेळी राज्यांना ऑक्सिजन लवकर मिळावा, यासाठी भारतीय लष्कराची मदत घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर मुख्यमंत्री असूनही काहीच करू शकत नसल्याची व्यथाही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मांडली.

ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा हवाई मार्गाने झाला पाहिजे. ऑक्सिजन एक्सप्रेसची सुविधा दिल्लीत सुरु झाली पाहिजे. त्याचबरोबर देशात लस एकाच किंमतीत देणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्यांना वेगवेगळ्या किंमती का?, असा प्रश्नही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत उपस्थित केला.

ऑक्सिनजचा दिल्लीत तुटवडा असल्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली. ऑक्सिजन टँकर्सना शहरात प्रवेश करण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ऑक्सिजन टँकर्सची दिल्लीमध्ये सुरळीत वाहतूक व्हावी, यासाठी मी हात जोडून विनंती करतो, असेही त्यांनी मोदींना म्हटले.

ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट नसेल तर दिल्लीच्या लोकांना ऑक्सिजन मिळणार नाही का? दिल्लीसाठी येणारा ऑक्सिजन टँकर दुसऱ्या राज्यात रोखल्यानंतर केंद्रात मी कोणाशी बोलावे हे आपण सुचवावे, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.