महाराष्ट्राला रेमडेसिवीरची अत्यावश्यक गरज असताना गुजरातमध्ये होत आहे मोफत वाटप : संजय राऊत


मुंबई – महाराष्ट्राला ८० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची अत्यावश्यक गरज असल्याचे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या होत असून महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित असल्यामुळे अधिक आरोग्य सुविधा महाराष्ट्राला मिळाव्यात, अशी आमची मागणी असल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. पण दुसरीकडे मात्र गुजरातमध्ये रेमडेसिवीरचे मोफत वाटप सुरू आहे. एखाद्या राजकीय पक्षाला रेमडेसिवीर कसे मिळते हा गंभीर प्रश्न असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

देशाला उद्देशुन केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि लसींची कमतरता पडणार नसल्याचा संदर्भ राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. राऊत यांनी पुढे बोलताना, पंतप्रधानांनी आरोग्य सेवांचा तुटवडा होणार नसल्याचे सांगितलेले असतानाही महाराष्ट्रात लसी, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची कमतरता का निर्माण केली जात आहे हा प्रश्न वारंवार निर्माण होत, असल्याचे म्हटले आहे.

तसे काही पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या मनात नसेलही पण मग हे कोण राजकीय शुक्राचार्य आहेत, जे फक्त महाराष्ट्राशी वैर घेऊन महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खेळत आहेत?, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. अशा संकटसमयी राजकीय वैर घेऊन राजकारण करु नये, असेही राऊत यांनी प्रत्यक्षपणे कोणाचेही नाव न घेता म्हटले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री केंद्र सरकारशी संपर्क साधून योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

राऊत यांनी महाराष्ट्रामध्ये लावण्यात आलेल्या निर्बंधांबद्दल बोलताना, कठोर निर्बंध महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी लावले आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांची संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी असल्याचे म्हटले आहे. कोरोनाचा नवीन ट्रेस हा अधिक भयंकर असून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक चाचण्या होत असल्याने रुग्ण संख्या अधिक असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.