केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच धावणार “लालपरी” – अनिल परब


मुंबई – राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात असून या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना एक महत्वपूर्ण माहिती राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच एसटी बसेस धावणार असल्याचे त्यांनी सांगितले

यावेळी अनिल परब म्हणाले, एसटी बस या जिल्हांतर्गत आणि जिल्ह्याबाहेर देखील धावतील पण त्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच धावणार आहेत. या संदर्भात एसटीचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल? याची चर्चा करण्यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल. परंतु आता सरकारने ज्या काही गाइडलाईन्स दिलेल्या आहेत, त्यानुसार दोन्ही ठिकाणी एसटी धावतील. या एसटी बस फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच धावतील.

तसेच, आता त्या संदर्भात जे काही निकष आहेत, जिल्ह्याबाहेरील लोकांना येण्यासाठी किती दिवस विलगीकरणात ठेवयाचे? कशा पद्धतीने ठेवायचे? त्यांच्या हातावर शिक्के कसे मारायचे? या सगळ्या गोष्टींच्या निर्णयासाठी मंत्रालयाब बैठक होणार आहे. पण यामुळे एसटी संख्या देखील कमी होईल, कारण नेहमीप्रमाणे एसटी चालणार नाहीत. गाइडलाईन्सचे तंतोतंत पालन केले जाईल. एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जर लोक जाणार असतील, तर सरकारने म्हटल्यानुसार त्यांना हातावर शिक्के मारून १४ दिवस विलगीकरणात रहावे लागेल.