देशात कोरोनाचे मृत्यू तांडव! काल दिवसभरात १.७६१ जणांनी गमावला जीव


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. मागील काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबरच यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा देखील वाढत असून, ताज्या आकडेवारीमध्ये त्यात अधिक भर पडली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांच्या वाढीत कमी झाली असली, तरी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या कमालीची वाढली आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी दीड हजारांहून अधिक कोरोनाबळीची नोंद झाली आहे.

सोमवारी दिवसभरात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशात २ लाख ५९ हजार १७० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. तर दुसरीकडे १ लाख ५४ हजार ७६१ जण कोरोनावर यशस्वीरित्या मात करून घरी परतले आहेत. दररोजच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत असले, तरी काळजीची बाब म्हणजे देशात दिवसेंदिवस मृतांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत देशात १ हजार ७६१ बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मागील काही दिवसांपासून प्रचंड वेगाने वाढ होत असलेल्या दुप्पट रुग्णवाढीचा कालावधीही झपाट्याने कमी झाला आहे. रविवारी देशात २ लाख ७३ हजार ८१० नवीन कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यात सोमवारी घट झाली असली तरी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. रविवारी १,६१९ जणांचा मृत्यू झाला होता. तर सोमवारी १ हजार ७६१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एकाच दिवसात मृत्यूचा आकडा शंभरपेक्षा अधिक वाढला आहे.