सर्व प्रवासी रेल्वे नेहमीप्रमाणे सुरु रहातील; रेल्वे मंत्रालयाने केले स्पष्ट


नवी दिल्ली – कोरोना महामारीने पुन्हा एकदा देशात थैमान घातले असून यावर केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांमध्ये नेमकी काय स्थिती आहे तसंच काय उपाययोजना केल्या जाव्यात, यासाठी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर तज्ञांसोबतही चर्चा करत आहे. महाराष्ट्रात कडक निर्बंध असताना दिल्लीत सहा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. दरम्यान परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवरही काही राज्यांनी निर्बंध आणले आहेत. यादरम्यान अनेकांना प्रवासी रेल्वे सेवा सुरु राहणार की बंद होणार असे प्रश्न उपस्थित होत आहे.


सर्व प्रवासी रेल्वे नेहमीप्रमाणे सुरु रहातील, असे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याबाबतची माहिती रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत दिली असून घाबरण्याची किंवा अंदाज बांधण्याची कोणतीही गरज नसल्याचे म्हटले आहे. प्रवासी तिकीट बूक करुन आरामशीर आणि सुरक्षितपणे इच्छित स्थळी प्रवास करुन शकतात, असे रेल्वेने म्हटले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळले जातील, असे स्पष्ट करताना नागरिकांनी तिकीट कंफर्म असेल किंवा आरक्षण असेल तरच रेल्वे स्थानकावर यावे, अशी विनंती रेल्वेने केली आहे.