पियुष गोयल यांचे अजब वक्तव्य; ऑक्सिजनची मागणी राज्यांनी नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे


नवी दिल्ली : सध्या कोरोनाचे थैमान देशभरात पाहायला मिळत असून, त्यामध्येच आणखी एका संकटाची ती म्हणजेच ऑक्सिजनच्या तुटवड्याची भर पडताना दिसत आहे. राज्याराज्यांमध्ये होणारा ऑक्सिजनचा तुटवडा भरुन काढण्यासाठी म्हणून केंद्र सरकारनंही आता काही महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचअंतर्गत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. ऑक्सिजन एक्सप्रेस या रेल्वे धावण्यासाठी ग्रीन कॉरिडोर सुरु करण्यात येणार असून, त्या माध्यमातून राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.

विविध ठिकाणांवर ऑक्सिजन सिलेंडर आणि टँकर रेल्वेच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये ग्रीन कॉरिडोरने मोठी मदतही होणार आहे. 22 एप्रिलपासून नऊ क्षेत्र वगळता तात्पुरती गरज म्हणून औद्योगिक कारणांसाठी होणारी ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा थांबवण्यात येणार आहे. ऑक्सिजन पुरवठा रुग्णालयांना योग्य प्रमाणात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे गोयल म्हणाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

कोरोनाचे संकट येण्यापूर्वी देशात दर दिवशी 1,000-1,200 मेट्रिक टन एवढ्या ऑक्सिजनची गरज लागत होती. पण, देशात 15 एप्रिलला 4795 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन वापरला गेला; ही वस्तुस्थिती मांडत त्यांनी देशात मागील वर्षापासून ऑक्सिजन निर्मितीचे प्रमाण वाढवण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी त्यांनी 12 राज्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रत्येत राज्याच्या गरजेनुसार आता, 6177 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहितीही दिली. पण असे असले तरीही राज्यांनी ऑक्सिजनची गरज नियंत्रणात ठेवणेही तेवढीच महत्त्वाची बाब त्यांनी अधोरेखित केली.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाबाधित झपाट्याने वाढत असल्यामुळे ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. अशातच नागरिक खाजगी ऑक्सिजन वितरकांकडून ऑक्सिजन सिलेंडर घेण्यास रांगा लावत आहेत. यात आता नागरिकांसाठी पोर्टेबल ऑक्सिजन कॅनही उपलब्ध होऊ लागले आहेत. या अगोदर परदेशात खेळाडू, गिर्यारोहक हे कॅन ऑक्सिजनची पातळी तातडीने वाढविण्यासाठी वापरत होते. पण कोरोनाकाळात आता या पोर्टेबल ऑक्सिजन कॅनची मोठी मागणी वाढली आहे.