ऑक्सिजन, रेमेडेसिवीरवरुन चंद्रकांत पाटील यांची उद्धव ठाकरेंवर टीका


पुणे – राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अजूनच गडद होऊ लागले आहे. त्याचबरोबर राज्यातील कोरोनाबाधितांच्या वाढीचा वेग दिवसागणिक वाढत असून, त्याचा अतिरिक्त भार आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. राज्यात बेडबरोबरच ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचाही तुटवडा जाणवत असल्यामुळे राज्य सरकारकडून सातत्याने केंद्राकडे याची मागणी केली जात आहे. राज्यात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. सगळे बील केंद्रावर फाडून मोकळे व्हायचे. रेमडेसिवीर इंजेक्शन केंद्र देणार. ऑक्सिजन केंद्र देणार. मग तुम्ही काय करणार? १९ दिवस रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करायला लागतात, गुजरात सरकारने तो कालावधी ४ दिवसांवर आणला. तशी वेगळी मशिनरी उभी केली. आता २२ तारखेनंतर खूप इंजेक्शन उपलब्ध होतील, कारण अडीच कोटी इंजेक्शन फॅक्टरीमध्ये तयार आहेत. पण, ती १९ दिवसांशिवाय बाहेर काढता येत नाही. गुजरातने नवीन युनिट उभे केले आणि ते चार दिवसांवर आणले. ऑक्सिजन निर्मितीची केंद्र उत्तर प्रदेशात सुरू झाली आणि ऑक्सिजन तयार करण्याच्या प्लांटचा पैसा महाराष्ट्रात पडून आहे. हे कधी सांगणार? प्रत्येकवेळी केंद्राकडे… तुमचे काय कर्तृत्व आहे की नाही? पीपीई किट घालून उद्धव ठाकरेंनी बाहेर पडावे आणि कारखानदारांच्या भेटीगाठी घ्याव्यात, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला.

मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार विरोधी पक्षनेत्याला असतात. ते माहिती घेऊ शकतात. घटनेमध्ये तशी तरतूद असल्यामुळे त्यांनी पोलिसांना जाब विचारला. कुणालाही उचलून आणायला काय महाराष्ट्रात बेबंदशाही आहे का? आम्ही रेमडेसिवीर घेऊन काय पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का? आम्ही महाराष्ट्रालाच देणार होतो. मग रेमडेसिवीर घेतल्या तर चुकले कुठे?, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.