सत्ता गेल्यापासून देवेंद्रभाऊ माशासारखे तडफडत आहेत – एकनाथ खडसे


जळगाव : सत्ता गेल्यापासून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माशासारखे तडफडत असून ते ब्राम्हण असले तरी त्यांची सरकार पडणार असल्याची भाकिते खरी ठरत नसल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. खडसे म्हणाले की, मला वाटते त्यांना रात्री बेरात्री सत्ता कधी येईल याची देखाली त्यांना स्वप्न पडत असतील. पण सध्या सरकार पडणार असल्याचे ते सांगत आहेत. वेगवेगळ्या तारखांचे त्यासाठी भाकीत करत आहेत. ते ब्राम्हण असल्याने त्यांचे भाकीत खरे ठरेल, असे मला वाटत होते. पण त्यांचे कोणतही भाकीत खरे ठरले नसल्याचे खडसे म्हणाले.

खडसे म्हणाले की, भाजपमधील अनेक आमदार नाराज आहेत. त्यांची नाराजी कमी करण्यासाठी पुन्हा आपले सरकार येणार असल्याचा आशावाद फडणवीस त्यांच्या आमदारांना देत आहेत. पण हे सरकार पडणार नाही आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. मात्र त्यांना याच ज्ञान नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला. रेमडेसिवीर इंजेक्शनचा सध्या मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. पण केवळ केंद्र सरकारच्या धोरणामुळे हा तुटवडा आहे. आपले लोक संकटात असताना या इंजेक्शनची निर्यात करण्यात येत होती. ही निर्यात करण्यात आली नसती, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. पण आपले नागरिक मेले तरी चालतील पण जगात आपले नाव करण्यासाठी परवापर्यंत या इंजेक्शनची निर्यात सुरू ठेवली असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.

सध्याच्या काळात राजकारण बाजूला ठेवत एकमेकांना सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे सांगताना त्यांनी आपणही विरोधी पक्षात असताना राज्य अडचणीत असताना सरकारला मदत करण्याची भूमिका घेतली होती, मात्र सध्याच्या विरोधी पक्ष नेत्यांकडून ते बघायला मिळत नाही, असे खडसे म्हणाले.