कुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते


मुंबई – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना प्रादुर्भावाचा वेग प्रचंड वाढला असून, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. दुसरीकडे हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यावरून चिंता व्यक्त केली जात आहे. कुंभमेळ्यामुळे कोरोनाचा मोठा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच कुंभमेळा समाप्त करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काँग्रेसच्या नेत्याने मोदींनी आवाहन केल्यानंतर समाधान व्यक्त करत टोला देखील लगावला आहे.

कोरोनाचा कुंभमेळ्यात शिरकाव झाला असून, मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहे. अनेक साधू आणि भाविकांना कोरोनाची लागण झाली असून, कुंभमेळ्यातून परतीची घोषणाही काही आखाड्यांनी केली. दरम्यान, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करून समाप्त करण्याचे आवाहन केले. काँग्रेस नेते संजय निरुमप यांनी या आवाहनानंतर ट्वीट करून निशाणा साधला आहे.


बरे झाले कुंभमेळा समाप्त करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले. हेच जर दुसरे कुणी केले असते, तर त्याला हिंदूविरोधी ठरवले असते. ४९ लाख लोकांनी कालपर्यंत स्नान केले आहे. कोलकातापर्यंत जाणारी गंगा कोरोना कुठपर्यंत घेऊन जाईल, माहिती नसल्याचे म्हणत कुंभमेळा तात्काळ समाप्त करायला हवा, असे आवाहन निरुपम यांनी स्वामी अवधेशानंद गिरी यांना केले आहे.