हाय अलर्ट ! कोरोनामुळे देशात दररोज होऊ शकतो २ हजार २३० जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशात प्रचंड उद्रेक झाल्यानंतर हे संकट आता दिवसेंदिवस अजूनच गडद होताना दिसत आहे. गुरुवारी देशात आतापर्यंतची उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवली गेली. तर १०३८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या वाढीव संख्येमुळे चिंतेत भर पडलेली असतानाच आणखी एक धोक्याचा इशारा भारतासाठी देण्यात आला आहे. देशात जूनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दररोज २ हजार ३२० जणांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात रौद्ररुप धारण केले आहे. बाधितांची संख्या दररोज प्रचंड वेगाने वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणांवर असह्य ताण पडताना दिसत आहे. तर दुसरीकडे बेडपासून ते इतर आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. देशात अशी परिस्थिती असताना आता आणखी एक भयावह अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात दररोज १ हजार ७५० लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात दररोज २ हजार ३२० लोक कोविडमुळे मरण पावतील, असे इंडिया टास्क फोर्स सदस्यांच्या आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

हा अहवाल ‘भारतातील दुसऱ्या कोरोना लाटेच व्यवस्थापन : तातडीचे उपाय’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या प्रमुख मुद्द्यांवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला असून, कोरोना संक्रमणाचा वेग कमी करण्यास परिणामकारक ठरणाऱ्या उपाययोजनांचीही शिफारस करण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या अंगानी बघितले तर पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट वेगळी असल्याचे अहवालात म्हटले आहे.

दुसऱ्या लाटेत दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्या वाढीचा वेग पहिल्या लाटेपेक्षा जास्त आहे. फेब्रवारी ते एप्रिल या कालाधीत १० हजार रुग्णसंख्येवरून ८० हजार रुग्णसंख्या होण्यास फक्त ४० दिवसच लागले. रुग्णसंख्येचा हा टप्पा गाठण्यासाठी पहिल्या लाटेत म्हणजेच सप्टेंबरमध्ये तब्बल ८३ दिवस लागले होते. दुसरे म्हणजे लक्षणे नसलेल्या वा लक्षणांची तीव्रता कमी असलेल्या रुग्णांची संख्या कमी होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आणि मृत्यूचे प्रमाणही कमी होते. कोरोनाचा शिरकाव भारतात झाल्यानंतर सुरुवातीला म्हणजे मार्च २०२० मध्ये मृत्यूदर १.३ टक्क्यांच्या जवळपास होता. तर २०२१मध्ये ०.८७ एवढा असल्याचेही यात म्हटले आहे.