नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक मदत करण्याची मागणी


मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनामुळे राज्यातील आर्थिकचक्र थांबल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक दुर्बल घटकांना मदतीची घोषणा केली. मुख्मंत्र्यांनी पाच हजारहून कोटींहून जास्त पॅकेजची घोषणा केली आहे. पण कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या पॅकेजमध्ये शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले व छोटे व्यावसायिक यांचा समावेश करण्यात आलेला नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्र लिहिले आहे.

शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले व छोटे व्यावसायिक हे घटकही कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत प्रभावित होणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठीही पॅकेजमध्ये तरतूद करून या घटकांनाही उचित न्याय द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

भाजीपाला, फळबागायती व फुलांच्या शेती व्यवसायावर संचारबंदीच्या कालावधीत मोठा परिणाम होणार आहे. या कालावधीत मार्केटमध्ये मालाचा उठाव मोठ्या प्रमाणावर होत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार तसेच सलूनचे दुकान बंद असल्याने या व्यावसायिकांचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या कालावधीत सर्व धार्मिक स्थळांवर बंदी असल्याने फुल विक्रेत्यांवरही उपासमारीची वेळ येणार आहे. मुंबईतील महत्वाचा घटक असलेल्या डबेवाल्यांचाही या पॅकेजमध्ये समावेश करून या घटकांना लाभ द्यावा, असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.