‘लस उत्सव’ मोहिमेअतंर्गत आतापर्यंत 11 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून केंद्र सरकारने त्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला आहे. 11 कोटी 10 लाख 33 हजार 925 लोकांचे आतापर्यंत लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या लस उत्सवाच्या पहिल्या तीन दिवसातच कोरोनाच्या एक कोटीपेक्षा लोकांच्या लसीकरणाचा विक्रम करण्यात आला आहे.

लस उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 25 लाखाहून जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेनुसार देशात रोज 45,000 कोविड लसीकरण केंद्र सुरू असतात. या केंद्रांच्या संख्येत मंगळवारी जवळपास 21,000 ची वाढ करण्यात आली असून ती 67,893 एवढी करण्यात आली होती. लस उत्सवाच्या पहिल्या दिवशी 30 लाख डोस, दुसऱ्या दिवशी 40 लाख डोस आणि तिसऱ्या दिवशी 25 लाखाहून जास्त डोस देण्यात आले आहेत.

16 जानेवारीला देशातील लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आतापर्यंत 11 कोटी 90 लाख 48 हजार 79 लोकांनी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. 55 हजार 80 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या असून राज्यातही लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनंतर देशभरात 10 एप्रिलपासून लस उत्सव सुरू करण्यात आला आहे. 14 एप्रिलपर्यंत तो सुरू राहिल. अधिकाधिक नागरिकांपर्यंत लस पोहोचवणे हा यामागील मुख्य हेतू आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या अनेक राज्यांतील नागरिकांना ‘लस उत्सव’ या मोहिमेअंतर्गत लसीकरणासाठी आवाहन करण्यात येणार आहे. त्यासाठी काही नेतेमंडळींनीही पुढाकार घेत नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबतची जनजागृती करण्यासाठी योगदान दिले आहे.