अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने वर्तवली भारत-पाकिस्तानमध्ये आगामी पाच वर्षात मोठ्या युद्धाची शक्यता


वॉशिग्टन : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान 2025 पर्यंत एक मोठे युद्ध होण्याची शक्यता असल्याचा अहवाल अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने अमेरिकन सरकारला दिला आहे. अमेरिकन सरकारकडे नॅशनल इन्टेलिजन्स कौन्सिलने त्यांचा ‘ग्लोबल ट्रेन्ड्स रिपोर्ट’ दिला असून त्यामध्ये ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे. जगातील सगळे देश आणि गुप्तचर संघटना अमेरिकेच्या या अहवालाला गंभीरपणे घेत आहेत.

भारत-पाकिस्तानबद्दल ‘फाईव्ह इयर रिजनल आऊटलूक रिपोर्ट- साऊथ एशिया’ या प्रकरणात भाष्य करण्यात आले आहे. दक्षिण आशियात भविष्यात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण होईल, या प्रदेशात अशांतता पसरेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याच प्रकरणात भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठे युध्द होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. हे युद्ध अनेक दिवस चालणार असून दोन्ही देशांच्या अनेक सैनिकांना यात बलिदान द्यावे लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

या अहवालावरून पाकिस्तानी मीडियातही खळबळ माजलेली असताना भारतात मात्र त्याची कोणतीही चर्चा होत नाही ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. या अहवालावर एक सविस्तर बातमी पाकिस्तानचे प्रमुख वृत्तपत्र ‘डॉन’ ने 9 एप्रिलला छापली असून त्यामध्ये यावर चिंता व्यक्त केली आहे. 10 एप्रिलला या अहवालावर भारतात ‘फ्रन्टलाईन’ या मॅगेझिनने एक लेख प्रसिद्ध केला आहे.

या दोन देशांदरम्यान केवळ युद्ध होणार असे सांगितले नाही, तर त्याची कारणे काय असतील यावरही या अहवालात भाष्य करण्यात आले आहे. त्यात येत्या पाच वर्षाच्या कालावधीत भारतात मोठा दहशतवाही हल्ला होणार असल्याचे सांगितले आहे. भारत सरकार त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करेल आणि युद्ध सुरू होईल असे सांगितले आहे. या आधी भारतात पुलवामा हल्ला झाला, त्यावेळी भारताने बालाकोट सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानला उत्तर दिल्यामुळे भारतावर भविष्यात कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर देण्याचे संकेत त्या माध्यमातून देण्यात आले होते.

भारतावर आगामी काळात दहशतवादी हल्ला होणार असून त्याचे धागेदोरे थेट पाकिस्तानशी संबंधित असतील. त्यामुळे या आधीच्या कारवाई प्रमाणे त्यावेळीही आक्रमकपणे कारवाई करावी, असा दबाव भारतीय जनतेचा भारत सरकारवर असेल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या मिस कॅलक्युलेशनमुळे या दोन देशात युध्द होईल, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

जरी भारत-पाकिस्तान दरम्यान मोठे युद्ध होण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली असली तरी ते युध्द अणूयुध्दामध्ये रुपांतरित होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे. दोन्ही देशांचे सरकार अणू हल्ल्याचे पाऊल उचलण्याची चूक करणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. पण या युध्दामुळे पुढची अनेक वर्षे या दोन देशांना आणि दक्षिण आशियाला गंभीर आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागणार असल्याचे सांगितले आहे.

भारत आणि चीन या दोन देशांच्या संबंधावरही या अहवालात भाष्य करण्यात आले आहे. गलवानच्या खोऱ्यात या दोन देशांच्या सैनिकांमध्ये जी झडप झाली तशीच एखादी घटना येत्या पाच वर्षात पुन्हा घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे वगळता भारत आणि चीन दरम्यान कोणतेही युध्द होणार नसल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

दक्षिण आशियाच्या प्रदेशात भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण करणारा आणखी एक विषय अफगाणिस्तानचा असेल. अमेरिकेने जर अफगाणिस्तानला तालिबानच्या हाती सोडून दिले, तर ती पाकिस्तानसाठी सुवर्ण संधी असेल. तालिबानशी पाकिस्तानचे संबंध लक्षात घेता या प्रदेशात अनेक दहशतवादी गटांना प्रशिक्षित करण्यात येईल आणि त्याचा वापर काश्मिर तसेच भारतातील इतर दहशतवादी कारवायांसाठी करण्यात येईल. त्यामुळे अफगाणिस्तानचे भविष्य काय असेल त्यावरच या प्रदेशाचे भविष्य ठरणार असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

आपल्या एका अहवालात युएनडीपी अर्थात युनायटेड नेशन्स डेव्हलपमेन्ट प्रोग्रॅमने सांगितले आहे की, 2025 पर्यंत पाकिस्तानमध्ये पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवणार आहे. पाकिस्तानमध्ये पाण्याचे संवर्धन करण्याबद्दल कोणतीही पाऊले उचलली जात नाहीत. तसेच पावसाच्या पाण्याचेही नियोजन करण्यात येत नसल्यामुळे येत्या पाच वर्षात पाकिस्तानच्या एका मोठ्या लोकसंख्येला पाण्याच्या तुटवड्याला सामोरे जावे लागेल. अशा वेळी त्या देशातील नागरिकांच्यात सरकार विरोधात असंतोष वाढणार असून त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान भारतासोबत युद्ध छेडण्याचा प्रयत्न करेल, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

अमेरिकेच्या नॅशनल इन्टेलिजन्स कौन्सिलकडून दर चार वर्षांनी ग्लोबल ट्रेन्ड्स रिपोर्ट हा तयार करण्यात येतो. अमेरिकेचे गुप्तचर खात्याकडून हा अहवाल तयार करण्यासाठी मोठा रिसर्च केला जातो. हा अहवाल अमेरिकन गुप्तचर खाते कशा प्रकारे तयार करते किंवा त्यासाठीची माहिती कुठून घेते याची कुणालाही कल्पना नाही. पण आतापर्यंतच्या सर्व जुन्या अहवालांचा अभ्यास केला असता ते सर्व अहवाल खरे ठरले आहेत.

या अहवालात भविष्यातील लोकसंख्येची दिशा आणि दशा, पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान, जे जगावर परिणाम करू शकतात त्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय संस्था आणि व्यवस्था, वेगवेगळ्या देशांच्या व्यवस्था आणि समाजातील उभरत्या प्रेरक शक्तींचा अभ्यास आणि विश्लेषण या अहवालात करण्यात आले आहे. सर्वात विशेष म्हणजे 2040 सालापर्यंत जगभरात कोणत्या घडामोडी घडू शकतात त्यांचे विश्लेषण या अहवालात करण्यात आले आहे.

हा अहवाल जागतिक आव्हाने, जगात कोणत्या गोष्टींवरून फूट पडू शकते, त्यावरून येणारी असमानता, स्पर्धा आणि त्याला जुळवून घेण्यासाठीचे प्रयत्न या पाच थीमच्या आधारे तयार करण्यात आला आहे.

2016-17 साली ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना या आधीचा ग्लोबल ट्रेंडस रिपोर्ट तयार करण्यात आला होता. त्यामध्ये सांगण्यात आले होते की येत्या काही वर्षात जगात पॅन्डेमिक अर्थात महामारी येणार असून त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था अस्ताव्यस्त होऊन ती मंदीत जाणार आहे. आता कोरोनाच्या अचानक आलेल्या महामारीमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून Global Trends Report मध्ये वर्तवण्यात आलेली शक्यता खरी ठरली आहे. या अहवालाचा इतिहास आणि त्याचा तंतोतंतपणा पाहिल्यास, भारत आणि पाकिस्तानच्या संभाव्य युध्दाची शक्यता लक्षात घेता दक्षिण आशिया खरोखरच अशांततेच्या उंबरठ्यावर आहे.