दिलासादायक ; काल दिवसभरात देशात 97 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त


नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढताना दिसत असून कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. देशभरात मागील 24 तासांत 1,61,736 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर एकूण 879 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. काल दिवसभरात देशात 97,168 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

सध्या देशभरात कोरोनाचे एकूण 1,36,89,453 रुग्ण आहेत. यामध्ये 12,64,698 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 1,71,058 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच एकूण 1,22,53,697 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे झाले आहेत.

सोमवारी राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा कालच्या तुलनेत कमी झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे काल डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या वाढ झालेल्या रुग्णांच्या तुलनेत जास्त आहे.

महाराष्ट्रात आज 51751 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आणि काल नवीन 52312 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 28,34,473 रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. राज्यात एकूण 5,64,746 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. काल राज्यात 258 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे एकूण 58,245 लोकांचा बळी गेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.94% झाले आहे. पुण्यात काल दिवसभरात 9621 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 86 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

लसीकरण अभियानाच्या दुसऱ्या दिवशी देशात सोमवारी कोरोना लसीचे 37 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. ज्यामुळे देशात आतापर्यंत एकूण 10,82,92,423 लसीचे डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, टीका उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी रात्री 8 वाजेपर्यंत लसीचे 37 लाखांहून अधिक डोस देण्यात आले.