आजपासून देशभरात ‘लस उत्सव’ मोहिमेला सुरुवात


नवी दिल्ली – आज (रविवार)पासून 14 एप्रिलपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार देशभरात ‘लस उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. कोरोना लस अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा यामागील मुख्य हेतू आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या अनेक राज्यांतील नागरिकांना ‘लस उत्सव’ या मोहिमेअंतर्गत लसीकरणासाठी आवाहन करण्यात येणार आहे. त्यासाठी काही नेतेमंडळींनीही पुढाकार घेत नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबतची जनजागृती करण्यासाठी योगदान दिले आहे.

शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील 85 दिवसांमध्ये भारतात 10 कोटी लसी देण्यात आल्यामुळे जगातील सर्वात वेगवान लसीकरण मोहिम राबवणारा भारत हा पहिलाच देश ठरत आहे. 10 कोटी लसी देण्यासाठी चीनला 102 दिवसांचा कालावधी लागला होता.

कोणत्याही प्रकारे लस वाया जाऊ दिली जाणार नाही, यावर आपण लक्ष दिले पाहिजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यासाठी आग्रही दिसले, यामुळे अनेकदा परिस्थिती आणि प्रसंग बदलण्यास मदत होते. महात्मा जोतिबा फुले यांची जयंती 11 एप्रिलला आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला आहे. आपण लस उत्सवाचे आयोजन करु शकतो का? तशी वातावरणनिर्मिती करु शकतो का? एका खास मोहिमेअंतर्गत आपण अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत ही लस पोहोचवली पाहिजे. लस कशा पद्धतीने वाया जाणार नाही, यावर लक्ष दिले पाहिजे. ‘लस उत्सव’ दरम्यानच्या चार दिवसांत लस वाया गेली नाही, तर आपली लसीकरण क्षमताही वाढलेली असेल.

दरम्यान, पंतप्रधानांनी एकीकडे लस उत्सवाची हाक दिलेली असतानाच महाराष्ट्रात मात्र लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच आता लसींच्या पुरवठ्यावरुन वेगळेच राजकारणही तापू लागल्यामुळे राजकारण बाजूला सारत नेतेमंडळी, सत्ताधारी आणि विरोधकांनी नागरिकांच्या हितासाठी एकत्र येण्याचाच सूर जनसामान्यांतून आळवला जात आहे.