कोरोनाच्या नियमांचे पालन केले नाही तर कडक कारवाई करण्याचा निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना इशारा


नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्ली उच्च न्यायालयाने पाठवलेल्या नोटिसीनंतर आता निवडणूक आयोगाने योग्य ती पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने कोरोना काळात सर्व नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे सांगितले आहे. सर्व राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगाने तशा आशयाचे पत्र लिहिले असून जर या नियमांचे पालन केले नाही, तर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील दिला आहे.

कोरोनाच्या नियमांचे जर पालन केले नाही तर सर्व राजकीय पक्ष, नेते, स्टार प्रचारक आणि उमेदवारांच्या सभा आणि रॅलीवर बंदी आणण्यात येईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. सभा असेल किंवा निवडणूक रॅली असेल, त्या काळात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. या नियमांचे जर पालन केले नाही तर वेगवेगळ्या नियमांच्या आधारे कारवाई करण्यात येईल, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. देशात गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पण ज्या राज्यात निवडणूक आहे, त्या राज्यात कोरोना नियमांचे पालन केले जात नाही, त्या नियंमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे.

अनेक नेते निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले. त्यामध्ये ना कुणाच्या तोंडावर मास्क असतो ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन. त्यामुळे या राजकीय नेत्यांना आता कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त आहे. अशा वेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने या नेत्यांना एक आवाहन केले आहे. ज्यावेळी हे नेते प्रचार सभा घेतील त्यावेळी त्यांनी आपल्या प्रचार सभेतून लोकांना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर या विषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करावी, असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगाने केले आहे.