केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली देशातील लसीकरणाची सविस्तर आकडेवारी


नवी दिल्ली – कोरोना लसीच्या डोसचा तुटवडा हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. लसीचे पुरेसे डोस केंद्राकडून येत नसल्याची तक्रार देखील महाराष्ट्रासह काही राज्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर देशात नेमके किती लसीकरण झाले? डोस खरच कमी पडले आहेत का? याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आता खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या प्रश्नांना उत्तर दिले असून देशात आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणाची सविस्तर आकडेवारीच त्यांनी मांडली आहे. त्याचबरोबर गेल्या २ महिन्यांत देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढले असून लोकांचे बेजबाबदार वर्तन त्याला कारणीभूत ठरल्याचे देखील आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत. त्यांनी यावेळी सादर केलेल्या आकडेवारीमध्ये आत्तापर्यंत दिलेले डोस, कुणाला किती डोस मिळाले, किती आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण झाले याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

भारतात गेल्या आठवड्यात एकाच दिवशी तब्बल ४३ लाख लोकांना लस देण्यात आली. जगभरात एकाच दिवशी झालेल्या लसीकरणाचा हा सर्वाधिक आकडा असेल, असे आरोग्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर देशात गेल्या २४ तासांमध्ये ३६ लाख ९१ हजार ५११ लोकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी देशातील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना झालेल्या लसीकरणाची देखील माहिती दिली. लसीचा पहिला डोस ८९ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. दुसरा डोस ५४ लाख कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. ९८ लाख फ्रंटलाईन वर्कर्सला पहिला तर ४५ लाख फ्रंटलाईन वर्कर्सला दुसरा डोस मिळाल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, आत्तापर्यंत देशात ४५ ते ५९ या वयोगटातील २ कोटी ६१ लाख लोकांना पहिला तर ५ लाख २३ हजार २६८ लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. त्याशिवाय, ६० पेक्षा जास्त वयाच्या ३ कोटी ७५ लाख लोकांना पहिला तर १३ लाख लोकांना दुसरा डोस मिळाला आहे.

काही राज्यांकडून लसींचा तुटवडा जाणवू लागल्याची तक्रार केली जात आहे. त्याचबरोबर देशात लसींचा पुरवठा अपुरा असताना केंद्र सरकार परदेशात लसीचे डोस निर्यात करत असल्याची टीका देखील करण्यात आली. त्यावर आत्तापर्यंत परदेशात किती डोस निर्यात झाले, याचीही आकडेवारी आरोग्यमंत्र्यांनी सादर केली. आत्तापर्यंत भारताकडून कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचे एकूण ६ कोटी ४५ लाख डोस इतर देशांना निर्यात करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकूण ८४ देशांचा समावेश आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये भारताची कोरोना चाचण्या करण्याची क्षमता किती प्रमाणात वाढली, याची देखील आकडेवारी हर्षवर्धन यांनी दिली. आजच्या घडीला आपल्याकडे दिवसाला १३ लाख लोकांची कोरोना चाचणी करण्याची क्षमता आहे. कोरोना चाचणी करणाऱ्या एका प्रयोगशाळेपासून सुरू झालेला हा प्रवास होता. आत्तापर्यंत आपल्याकडे २४४९ लॅब तयार झाल्या आहेत. त्याच आधारावर आत्तापर्यंत भारतात २५ कोटी ७१ लाख ९८ हजार चाचण्या झाल्या आहेत. गेल्या २४ तासातच आपण १३ लाख ६४ हजार चाचण्या केल्या असल्याचे ते म्हणाले.