देशात कुठेही लसीची कोणतीही कमतरता नाही – डॉ. हर्षवर्धन


नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी देशातील कोणत्याही भागात करोना लसीचा तुटवडा नसल्याची माहिती दिली असून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार केंद्र सरकार लस पुरवठा करत असल्याचेही ते म्हणाले आहेत. मंगळवारी ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेदेखील उपस्थित होते.

देशात परिस्थिती नियंत्रणात असून अनेक त्रुटी हर्षवर्धन यांनी यावेळी दाखवून दिल्या. यावेळी त्यांनी बेजबाबदार वर्तन आणि निष्काळजीपण कोरोनाचा कहर वाढण्याचे कारण असल्याचे अधोरेखित केले. हर्षवर्धन यांनी यावेळी कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी देशाचा रिकव्हरी रेट ९२.३८ असून मृत्यूदर १.३० टक्के असल्याची माहिती दिली.

देशातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या दोन महिन्यात अचानक वाढली आहे. अॅक्टिव्ह रुग्संख्या कमी असून रिकव्हरी रेट ९२.३८ आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी देशातील मृत्यूदर १.३० टक्के असल्याची माहिती हर्षवर्धन यांनी यावेळी दिली.

हा विषय आपल्यासाठी चिंतेचा आहे, एक वर्षाच्या अनुभवानंतर आपल्याकडे खूप ज्ञान आहे पण अद्यापही अनेक त्रुटी आहेत. पण मला वाटते सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात आहे. याआधी असलेले धोरण आपण नीट राबवले तर संख्या कमी होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सर्व गोष्टी पुन्हा सुरु झाल्या असून लोकांचे निष्काळजी वागणे मोठी चिंतेची बाब असल्याचे यावेळी ते म्हणाले.