दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय; कारमध्ये एकटे असाल तरी मास्क अनिवार्य


नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाची चौथी लाट आली असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे दिल्ली सरकारने कारमधून एकट्याने प्रवास करणाऱ्यांनाही मास्क अनिवार्य केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात सरकारच्या या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या याचिकेवर निकाल देताना याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले. मास्क हे कोरोनाचा प्रसार रोखण्यात सुरक्षा कवचासारखे असल्यामुळे कोट्यावधी लोकांचे जीव वाचले असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

दिल्ली सरकारने खासगी वाहनातून एकट्याने प्रवास करणाऱ्यांनाही मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. त्याचबरोबर दिल्ली सरकारने मास्क नसल्यास दंड आकारण्याचे आदेशही दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात याविरोधात चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने याचिककर्त्यांची कानउघाडणी केली.

जरी खासगी वाहनातून एक व्यक्ती प्रवास करत असेल, तरीही त्या व्यक्तीने मास्क वापरणे अनिवार्य असेल. वाहनात एक व्यक्ती असो की अनेक मात्र, मास्क लावणे बंधनकारकच आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. कोरोना रोखण्यासाठी वैज्ञानिक, संशोधक, आंतरराष्ट्रीय संस्था आणि सरकारकडून मास्क वापरण्यावर जोर दिला जात असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसी काही उपलब्ध झाल्या असल्या, तरी कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे मास्क वापरण्यावर जोर दिला जात आहे. व्यक्तीचे लसीकरण झालेले असो वा नसो, मात्र मास्क वापरणे आवश्‍यकच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क हे सुरक्षा कवचासारखच असल्याचे निदर्शन दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.