कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करा ; रामदास आठवले


मुंबई – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत असून कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज हजारोच्या संख्येने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेणे हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ठरू शकेल. त्यामुळे राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्याचा महाराष्ट्रच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतलेला निर्णय योग्य आणि स्वागतार्ह आहे. त्या प्रमाणेच १० वी आणि १२ वीच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती द्यावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

राज्यातील शाळा बंद आहेत, पण शाळांकडून फी आकारणी सुरूच आहे. एक तर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले आहे. आता दहावी बारावीच्या परीक्षा होत आहेत, पण या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना प्रमोट करायला हवे. कारण, ते कोणत्या मानसिकतेत असतील हे सांगता येत नाही, ते लहान आहेत. त्यांच्या मानसिकतेचा विचार व्हायरला हवा. हा प्रसंग आपल्यावर पहिल्यांदाच ओढवलेला असल्यामुळे राज्य सरकारला मी विनंती करतो की, खालच्या विद्यार्थ्यांना जसे प्रमोट केले, तसे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढे ढकलावे, असे मंगळवारी पत्रकार परिषदेदरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले होते.