देशात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक; केंद्राने व्यक्त केली चिंता


नवी दिल्ली – कोरोनामुळे महाराष्ट्रासह काही राज्यातील परिस्थिती गंभीर होत असून काही राज्यात कोरोनामुळे झालेल्या उद्रेकाने केंद्राच्या चिंतेत भर टाकली आहे. तीन राज्यात केंद्र सरकारकडून तज्ज्ञांची ५० पथके तैनात करण्यात आली असून, या पथकांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. यात महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ५८ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहे. तर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

देशातील कोरोना परिस्थितीची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय आरोग्य सचिव भूषण म्हणाले, देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या पहिला दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. एक जिल्हा कर्नाटकातील आहे. तर छत्तीसगढ आणि दिल्लीतीलही एका जिल्ह्याचा टॉप टेनमध्ये समावेश असल्याची माहिती भूषण यांनी दिली.

पंजाब आणि छत्तीसगढमध्ये कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ५८ टक्के उपचाराधीन रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. तर मृत्यूचे प्रमाण ३४ टक्के आहे. गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रात आरटी-पीसीआर चाचण्या घटल्या आहेत. महाराष्ट्र सरकारला आरोग्य मंत्रालयाने आरटी-पीसीआर चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे. सध्या फक्त ६० टक्के आरटी-पीसीआर चाचण्या महाराष्ट्रात होत असून, त्या ७० टक्क्यांच्या पुढे घेऊन जाण्याचे राज्य सरकारला सांगण्यात आल्याचे भूषण यांनी सांगितले.