राज्यातील पत्रकार मित्रांचे लवकर लसीकरण करावे, आव्हाडांची उद्धव ठाकरेंना विनंती


मुंबई – कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी मोठ्या प्रमाणात वाढ लक्षात घेत राज्यात कठोर निर्बंधांची घोषणा राज्य सरकारने केली आहे. दुसरीकडे राज्य सरकार जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावे यासाठी देखील प्रयत्न करत आहेत. सध्या ४५ आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना कोरोना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रकार बांधवांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विनंती केली आहे.

ट्विट करत पत्रकारांना लस देण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ते म्हणाले आहेत की, आज आपल्या एका पत्रकार मित्राचे कोरोनामुळे निधन झाले. मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणे जरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी ही विनंती.


आपल्या एका पत्रकार मित्राचे आज कोरोनामुळे निधन झाले.मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो कि, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणे जरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी ही विनंती.

नुकतेच मुंबईत एएनआय या वृत्तसंस्थेचे पत्रकार सबाजी मोहन पालकर यांचे निधन झाले. कोरोनाची त्यांना लागण झाली होती. रविवारी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.