देशमुखांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया


पुणे – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या या निर्णयानंतर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून मुख्यमंत्र्यांकडे तो सोपवण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. दरम्यान सतत राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपकडून यावर प्रतिक्रिया आली आहे.

पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले की, जे जे चुकेल त्याला शासन आहे, तोपर्यंत लोकशाही सदृढ होणार नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनात शंक होती. पवारांच्या घरी बैठक आहे, काय निर्णय घेतील? धनंजय मुंडेंच्या वेळीही सहा तास पवारांच्या घरी बैठक चालली. पण शेवटी धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही, असा निर्णय झाला.

अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी आरोप केल्यानंतर देखील शरद पवारांकडे बैठक झाली. राजीनामा न घेण्याचा निर्णय त्यावेळी झाला. बऱ्याच गोष्टी सांगण्याचा शरद पवारांनी प्रयत्न केला. पण खोटे पडल्यानंतर त्यांनी बोलणेच बंद केले. पण शरद पवार निर्णय घेत नाहीत तोवर राजीनामा झाला नसता. त्यामुळे मी समाधान व्यक्त करतो. शरद पवारांनी संवेदनशीलतेने सीबीआयचा तपास लागल्यावर मंत्रीपदावर राहता येत नाही याची जाणीव ठेवून निर्णय घेतला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.