३० एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात निर्बंध; अशी आहे नियमावली


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर नियमावली जारी करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उद्या सरकारकडून यासंदर्भातील आदेश आणि नियमावली काढण्यात येणार आहे. नवी नियमावली मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आली आहे. आज काही कडक निर्बंध लावण्यावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मिशन बिगीन अगेन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’ असे या आदेशांना संबोधण्यात येणार.

हे निर्बंध लावतांना राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून, लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील.

आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयानंतर या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले.

यात कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहतील याची माहिती पुढीलप्रमाणे:

  • शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.
  • १४४ कलम राज्यात लागू केले जाईल. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.
  • रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे पूर्णतः बंद राहतील. दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोक आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत असल्याचे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.
  • किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे.
  • नियमितपणे सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी ५० टक्के प्रवासी प्रवास करू शकतील. सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.
  • बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. रेल्वेमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.
  • खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील.
  • शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाही, तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना वैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.
  • यादरम्यान मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.
  • सर्वधर्मिंयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे.
  • पूर्णतः उपाहारगृहे व बार बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. पण टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील.
  • सकाळी ७ ते रात्री ८ केवळ रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. पण नियमांचे पालन होत नाही, असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करता येईल.
  • सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत ई कॉमर्स सेवा नियमितपणे सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये आणि संबधित दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.
  • सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर करावे.
  • नेहमीप्रमाणे वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरू ठेवण्यात येईल पण विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे.
  • उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.
  • चित्रीकरण सुरु ठेवता येईल, पण गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. याची अंमलबजावणी 10 एप्रिलपासून होईल.
  • बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोरोना झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल, कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे.
  • एखाद्या सोसायटीत ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार असून तसा फलक लावणार आणि बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी.