छत्तीसगड : नक्षलवाद्यांचा सुरक्षा रक्षकांवर हल्ला; पाच जवान शहीद


रायपूर : शनिवारी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या विजापूर आणि सुकमा या नक्षलवादी प्रभावित जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांवर अचानक हल्ला केला. सुरक्षा दलाचे पाच जवान तब्बल तीन तास चाललेल्या या चकमकीमध्ये शहीद झाले आहेत, तर 21 जवान अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत असल्याची माहिती राज्यातील नक्षलवादी विरोधी अभियानाचे पोलीस महानिरीक्षक ओपी पाल यांनी दिली.

सुरक्षा रक्षकांचे 12 जवान नक्षलवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात जखमी झाले आहेत. एका नक्षलवादी महिलेचे प्रेत या ठिकाणी सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी रात्री छत्तीसगड राज्यातील विजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे कोबरा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफच्या संयुक्त दलाने नक्षलवादी विरोधी अभियान सुरू केले होते.

जवळपास दोन हजार जवान या नक्षलवादी विरोधी अभियानात सामील होते. शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर अचानक हल्ला केला. ही चकमक सुमारे तीन तास सुरू होती. यामध्ये नक्षलवाद्यांचेही मोठे नुकसान झाले आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेची माहिती मिळताच यावर दु:ख व्यक्त करत या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे सांगितले. त्यानी आपल्या सोशल मीडियावरील संदेशात म्हटले आहे की, माझ्या संवेदना मावोवाद्यांच्या विरोधात लढताना शहीद झालेल्या जवानांच्या परिवारासोबत असून त्यांचे बलिदान कधीही विसरण्यात येणार नाही.