वाझेंनी मनसुखची हत्या करण्यासाठी केला लोकल प्रवास – एनआयए


मुंबई : ‘एनआयए’कडे (एनआयए) मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास सोपवण्यात आल्यानंतर या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी आणि खुलासे होत असतानाच असाच एक खुलासा समोर आला आहे. लोकलच्या गर्दीत ओळख पटणे कठीण असल्याने वाझे मोबाईल ऑफिसला ठेवून ठाण्याला लोकलने गेल्याचे तपासात समोर आले आहे. वाझेंनी लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून हे मोबाईल कार्यालयात ठेवून एका मिञाला तो उचलण्यासाठी ठेवले होते. जर कोणाचा फोन आल्यास साहेब कामात असल्याचा मेसेज देण्यास त्याला सांगितले होते.

दरम्यान सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर वाझे 7 च्या सुमारास सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यानंतर ते ठाणे स्थानकाबाहेर दिसले. पुन्हा लोकलनेच प्रवास करून ते भायखळाला उतरून बारवर रेड करण्यासाठी गेले. त्यांनी ज्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत त्यांचा मोबाईल घेऊन येण्यास सांगितले. जेणेकरून ते सर्व लोकेशन एकञ दिसतील आणि वाझेंवर कुणाला संशयही येणार नाही.

पण हिरेन हत्या प्रकरणात कुणा कुणाचा सहभाग आहे. त्या दिवशी कोण घटनास्थळी कोण होते. वाझेंचा रोल त्यात काय याचा तपास एनआयए करत आहे. हिरेन यांची हत्या ही गायमुख जवळील परिसरात केल्यानंतर त्यांचा मृतदेह हा मुंब्रा खाडी परिसरात टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पण शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे आता शवविच्छेदन करणारे डॉक्टरही रडारवर आहेत. गंभीर गुन्ह्यातील हिरेन ही संशयित व्यक्ती असताना त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन व्हिडिओ रेकॉर्डिंग का केले नाही. शवविच्छेदनावेळी डॉक्टरांनी वाझेंची भेट का घेतली. नेमकी त्यांच्यात काय चर्चा झाली. याची माहिती एनआयए घेत आहे.