कोरोनाचा विषाणू जसा आपले रुप बदलतो तसेच गुन्हेगारीचे रूपही बदलत आहे; उद्धव ठाकरे


नाशिक – नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील उप-निरिक्षकांच्या ११८ व्या सत्राचा दीक्षांत संचलन समारंभ पार पडला. यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा विषाणू जसा आपले रुप बदलतो आहे, त्याचा आता सेकंड म्युटंट आला आहे तसेच काहीसे आता रुप बदलणारी गुन्हेगारी आली असे म्हटले आहे. खडतर प्रशिक्षण पूर्ण करताना जल्लोष होणारच. पण बेहोश होऊन चालणार नाही. जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे लागेल. त्यासाठी भानावर राहावेच लागेल, अशी सूचना यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

आपण खडतर प्रशिक्षणानंतर एखादी गोष्ट कमावतो. त्याचा आनंद मोठा असतो. आजचा कार्यक्रम गेल्यावर्षी प्रत्यक्ष अनुभवला आहे. अंगावर रोमांच येतात. भारावून जाणारा समारंभ असतो. या समारंभात शिस्त आणि देखणेपणाचा अनोखा संगम असतो. पण आज मास्क घालूनच हा कार्यक्रम करावा लागत आहे. पोलीस दलाचे हेच महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शिस्त आणि नियमांचे पालन करत आहोत. कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी आजच्या समारंभातून महाराष्ट्राला देत आहोत. आपले शूर जवान टोकाच्या गडचिरोलीत सुद्धा नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करत आहेत. त्यांना टिपताहेत. महाराष्ट्राच्या मुळावर उठणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काम करत असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी कौतुक केले.

एकीकडे नक्षलवादाचा आणि दुसरीकडे कोरोनाचा मुकाबला पोलीस करत आहेत. दिसणाऱ्या शत्रुवर तुटून पडता येते. पण ही शस्त्र कोरोनाविरोधात चालत नाहीत. कारण तो न दिसणाऱा शत्रु आहे. पण हे आव्हानही पोलीसांनी स्वीकारले आहे. ते समाजासाठी, लोकांसाठी कोरोना काळातही कर्तव्य बजावत आहेत. प्रशिक्षणार्थींनी खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या तेरा महिन्यांच्या प्रशिक्षणातून त्यांनी सद़ृढ शरीर कमावलेच आहे. पण निरोगी आणि निकोप मनही या सेवेसाठी आवश्यक ठरते. कारण सेवा करताना पोलिसांना अनेक भूमिका बजावाव्या लागतात. चित्रपटात दाखवतात आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. प्रत्यक्षात पोलिसांना जमिनीवर राहून काम करावे लागते. त्यासाठी त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाबरोबरच प्रसंगावधनाच बाळगावे लागते. कारण पोलिसांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो. केले तर का केले आणि नाही केले, तर का नाही. त्यामुळे खडतर प्रशिक्षणातून मनशक्ती मिळावावी लागते. त्यासाठी इच्छाशक्तीही महत्वाची ठरते, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

हे आयुष्य प्रशिक्षणार्थींनी स्वतःहून निवडले आहे. ते साधसुधे नाही. त्यांनी यातून त्यांच्याकडे आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याचे सिद्ध केले असल्यामुळे स्वतःहून हे क्षेत्र निवडण्यासाठी आणि कुटुंबापासून दूर राहून खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या प्रशिणार्थींना मानाचा मुजराच करावा लागेल. तुम्ही एक स्वप्न पाहिले होते आणि त्या स्वप्नातील जगात पहिले पाऊल टाकत आहात. तेही निधड्या छातीने. कोरोनाचा विषाणू जसा आपले रुप बदलतो आहे. त्याचा आता सेकंड म्युटंट आला आहे. तसेच काहीसे आता रुप बदलणारी गुन्हेगारी आली आहे. गुन्हेगारी क्षेत्राचे हे आव्हान आता ऑनलाईन आणि त्या स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढू लागले आहे. बँकिंगमधील ऑनलाईन गुन्ह्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. गुन्हे ऑनलाईन असले, तरीही त्या गुन्हेगारापर्यंत पोहचून त्याला प्रत्यक्ष खऱ्या बेड्या घालव्या लागणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जल्लोष होणारच. पण बेहोश होऊन चालणार नाही. जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे लागेल. त्यासाठी भानावर राहावेच लागेल. तुम्ही प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडत आहात. तुमचे कुटुंबीय अधिरतेने तुमची वाट पाहत आहेत. पण आतापर्यंत तुम्ही प्रशिक्षणार्थी तुमच्या कुटुंबियांचे होता. पण आता संपूर्ण महाराष्ट्र हेच तुमचे कुटुंब आहे. आता या कुटुंबाला तुमचा आधार असणार आहे. तुमच्या स्वप्नात आता महाराष्ट्राचे स्वप्न मिसळून पाहावे लागणार आहे. तुम्हाला रक्षक, भाऊ, पुत्र म्हणून काम करावे लागणार आहे. लोक तुमच्याकडे विश्वासाने येणार आहेत. त्या जनतेचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवाल, असा विश्वासही मला आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या या परिवारात तुमचे स्वागत. महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कारकिर्द असणारे अधिकारी म्हणून तुम्ही सेवा बजावाल, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.