यामुळे विराट कोहली मॅन ऑफ द मॅच पुरस्कारावरुन संतापला


पुणे : भारताने इंग्लंडला पुण्यात खेळल्या गेलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात 7 धावांनी पराभूत केले. टीम इंडियाने यासह एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली. पण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मात्र सामना संपल्यानंतर संतापलेला दिसला. मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार भुवनेश्वर कुमारला, तर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार शार्दुल ठाकूरला न मिळाल्याबद्दल विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली.

सॅम करनला कालच्या अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले. त्याने इंग्लंडसाठी 95 धावांची वैयक्तिक खेळी करून विजयाच्या जवळ नेले. याशिवाय मालिकेच्या पहिल्या सामन्यात 94 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 124 धावा करणारा इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने मॅन ऑफ द सिरीज ठरला.

पण विराट कोहलीला हा निर्णय पटला नाही. विराटने याबद्दल नाराजी व्यक्त केली. विराट म्हणाला, भुवीला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार का मिळाला नाही, हे मला समजत नाही. अशा खेळपट्ट्यांवर फारच कमी धावा देत सहा विकेट घेणे मॅन ऑफ द सिरीज प्रमाणेच आहे. तर शार्दुलने 30 धावा केल्या आणि चार विकेट्स घेतल्या, परंतु तरीही तो मॅन ऑफ द मॅच ठरला नाही. हे पूर्णपणे समजण्यापलीकडे आहे.

भारताने मालिकेच्या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर विजयासाठी 330 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु इंग्लंडचा संघ 50 षटकांत 9 विकेट गमावून केवळ 322 धावा करू शकला. कसोटी आणि टी -20 मालिकेनंतर इंग्लंडनेही भारताविरोधात एकदिवसीय मालिका देखील गमावली.