धर्मनगरी वाराणसीत साजरी होते स्मशान भस्म होळी

holi
देशभरात २० मार्च रोजी होळी साजरी केली जात आहे. त्यानंतर रंगांची उधळण करून नागरिक उत्साहाने रंगपंचमी पर्यंत हे पर्व साजरे करतील. मात्र देशातील प्राचीन धर्मनगरी वाराणसी येथे गेल्या ३५० वर्षांपासून वेगळ्याच प्रकाराने होळी साजरी केली जाते. रंगभरी एकादशी झाल्यावर दुसरे दिवशी पार्वती किंवा गौरीची पाठवणी करण्याच्या निमित्ताने ही होळी खेळली जाते त्यावेळी मणिकर्णिका घाटावर जळत असलेल्या चिता मधून राख किंवा भस्म गोळा केले जाते आणि त्याची उधळण केली जाते.
holi1
पौराणिक कथेनुसार महाशिवरात्रीला महादेव पार्वती विवाह होतो आणि वसंत पंचमी पर्यंत हा विवाहसोहळा चालतो त्यानंतर एकादशीला पार्वतीची सासरी पाठवणी होते. या वेळी महादेव वऱ्हाडी सोबत महास्मशानात होळी खेळतात. ही होळी चिता भस्माने खेळली जाते. ती पाहण्यासाठी देश विदेशातून मोठ्या संख्येने लोक येतात. होळीची सुरवात होण्याअगोदर महाआरती केली जाते त्यावेळी जळत्या चितांच्या मध्ये ५१ संगीतकार विविध प्रकारची पारंपारिक वाद्ये वाजवितात.
holi2
असे मानले जाते कि या होळीत भूत, पिशाच्चासह सर्व जीव जंतू सामील होतात. चितेतील भस्म चाळले जाते आणि तेच एकमेकांच्या अंगावर आणि हवेत उडविले जाते. मृत्युनंतर मनकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार झाले तर त्या जीवाला मुक्ती मिळते अशी हिंदू धर्मीयांची भावना आहे. वाराणसी मध्ये मृत्यू आल्यास त्या जीवाला शिवत्व प्राप्त होते अशीही भावना आहे.

Leave a Comment