लूज बॉलवरच मोठी विकेट जाते; फडणवीसांच्या बॅटिंगनंतर राऊतांची जोरदार बॉलिंग


नवी दिल्ली : रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकदा हात पोळूनही एवढा विश्वास कसा ठेवला, याचे आश्चर्य वाटते. राजकारणात किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर एवढा विश्वास कधीही ठेवायचा नसतो. विश्वासाने खांद्यावर ठेवलेली मान हे अधिकारी कधीही बगलेत दाबू शकतात, हे आताच्या उदाहरणावरुन दिसून आले आहे. या सगळ्या अनुभवानंतर तरी अत्यंत सहजपणे सत्तेत जाऊन बसलेल्या लोकांनी शहाणपण शिकावे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्ली प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.

संजय राऊत यांनी यावेळी फोन टॅपिंग प्रकरणावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या. रश्मी शुक्ला यांनी लहान पक्षाच्या आमदारांना सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असताना भाजपसोबत जाण्यासाठी धमकावले होते. तरीही महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर त्या पाच ते सहा महिने पदावर कशा राहिल्या, याचे मला आश्चर्य वाटते. एकदा हात पोळल्यानंतरही एवढा कोणावर विश्वास ठेवायचा नसतो. याच मताचे शरद पवारही आहेत. रश्मी शुक्ला यांच्यावर वेळीच कारवाई केली असती तर विरोधी पक्षनेत्यांना दिल्लीत कागद फलकावयची संधी मिळाली नसती, असे संजय राऊत यांनी म्हटले.

एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या ठिकाणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मला फटकेबाजी करायला मजा येते, असे सूचक वक्तव्य केले होते. संजय राऊत यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी लूज बॉलवर फटकेबाजी जरूर करावी. पण मोठ्या विकेट या लूज बॉलवरच जातात, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे म्हटले आहे. स्पिन बॉलर कधी फास्ट चेंडू टाकत नाही. महाराष्ट्रात फक्त चंद्रशेखर भागवत हे एकटेच गुगली टाकायचे. बाकी गुगली गोलंदाज हे डुप्लिकेट असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

कधीही अधिकाऱ्यांवर विसंबू राहू नका, अस्तनीतील निखाऱ्यांना वेळीच दूर करा, ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती. युतीची सत्ता राज्यात आल्यावर बाळासाहेबांनी तत्कालीन मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची तातडीने बदली करण्याचे आदेश दिले होते, याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली. तसेच सत्तास्थापनेचे नाट्य महाराष्ट्रात सुरु असताना शरद पवार आणि माझा फोन टॅप झाला होता, असेही त्यांनी सांगितले. तसेच पत्रकारांवरही नजर ठेवली जात होती. एवढे करुनही भाजपची सत्ता आली नसल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला.