माजी खासदाराचा गंभीर आरोप; पुण्यातील बिल्डरांकडून खंडणी गोळा करायच्या रश्मी शुक्ला


मुंबई : रश्मी शुक्ला यांच्याविरोधात फोन टॅपिंगप्रकरणात आरोप झाल्यानंतर मोठी टीका होताना बघायला मिळत आहे. माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनीही याप्रकरणात रश्मी शुक्लांविरोधात आरोप करत या वादात उडी घेतली आहे. रश्मी शुक्ला पुण्याच्या पोलिस आयुक्त असताना पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्यामार्फत खंडणी गोळा करण्याचे काम करायच्या, असा आरोप केला आहे.

2016 साली धुमाळ एटीएसमध्ये कार्यरत असताना त्यांना प्रॉपर्टी सेलमध्ये कार्यरत असल्याचे दाखवत रश्मी शुक्ला यांच्यासाठी खंडणी वसुलीचे काम केल्याचा आरोप राठोडांनी केला आहे. हे प्रकरण गंभीर स्वरुपाचे असतानाही धुमाळांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याचबरोबर हे सर्व प्रकरण त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित होते. हे सर्व प्रकरण त्यांनीच रफा-दफा केल्याचा आरोप राठोडांनी केला.

पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांना निलंबित केल्याचे मीडियासमोर राठोड सांगितले होते. पण धनंजय धुमाळांवर माहितीच्या अधिकारात कोणतीही कारवाई आतापर्यंत झाली नसल्याचे उजेडात आले आहे. धुमाळ निवृत्त होण्यापूर्वीच त्यांना स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. हे प्रकरण माध्यमांसमोर आल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी धुमाळ यांचे निलंबन केल्याचे म्हटले होते. त्याचसोबत सदर फुटेजची सीडी फॉरेन्सिक लॅबला पाठवत त्यासंबंधी शहानिशा करु, असे देखील म्हटले होते. पण यातील एकही गोष्ट शुक्ला यांनी केली नाही.

नागपूरमध्ये रश्मी शुक्ला असताना पोलीस उपायुक्त होत्या. त्यांचे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यावेळी संबंध चांगले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस रश्मी शुक्लांना नेहमी अभय देत असत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरदहस्तामुळे हे प्रकरण देखील दाबून टाकण्यात आले. त्यामुळे रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करायच्या हे यावरुन देखील सिद्ध होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

रश्मी शुक्लांविरोधात याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केली आहे. या संबंधीचे सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना देत रश्मी शुक्लांविरोधात कडक कारवाई व्हावी यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचेही राठोड म्हणाले आहेत.

पुण्यातील एक बांधकाम व्यावसायिक संदीप जाधव यांना 2016 साली तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. जाधव यांनी याप्रकरणी व्हीडिओ क्लिप काढत धुमाळ यांची तक्रार केली होती. पण तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी याप्रकरणी कारवाई केली नव्हती. ही व्हिडिओ क्लिप माध्यमात आल्यानंतर माध्यमांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले होते.