बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मी २०-२२ वर्षांचा असताना सत्याग्रह केला होता – नरेंद्र मोदी


ढाका – दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असून मोदी तिथे बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी पोहचले आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी यावेळी त्याचे स्वागत केले व मोदींना गार्ड ऑफ ऑनर दिला गेला. पंतप्रधान मोदी यांनी या ठिकाणी पोहचल्यानंतर सर्वप्रथम ढाकामधील सावर येथील शहीद स्मारकास भेट दिली. त्यांनी त्या ठिकाणी वृक्षारोपण केले व तेथील व्हिजिटर्स बुकमध्ये संदेश लिहून स्वाक्षरी केली.

त्यानंतर पंतप्रधान मोदी ढाका येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या संघर्षात सहभागी होणे, माझ्या जीवनातील आंदोलनांपैकी एक होते. त्यावेळी माझे वय २०-२२ असेल, मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांनी जेव्हा बांगलादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता.

तसेच, भारताच्या शूर सैनिकांना मी आज सॅल्यूट करतो, मुक्तीजुद्धोमध्ये बांगलादेशच्या बंधू-भगिनींसोबत जे उभे राहिले. मला आनंद आहे की, या कार्यक्रमास बांगलादेश मुक्तीसंग्रमात भाग घेतलेले अनेक भारतीय सैनिक आज उपस्थित असल्याचे देखील मोदींनी यावेळी म्हटले.

शेख मुजीबुर रहमान यांना पंतप्रधान मोदी यांनी मरणोत्तर गांधी शांती पुरस्काराने सन्मानित केले. पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे त्यांनी हा पुरस्कार सपूर्द करून शेख मुजीबुर रहमान यांच्या आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले, दोन्ही देशांचे संबंध घट्ट होत आहेत. हा सन्मान देताना मला अत्यंत आनंद होत आहे. बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हामिद, पंतप्रधान शेख हसीना आणि येथील नागरिकांचे मी आभार व्यक्त करतो. या गौरवशाली क्षणांमध्ये, या उत्सवात तुम्ही सहभागी होण्यासाठी भारताला सप्रेम निमंत्रण दिले. सर्व भारतीयांच्यावतीने मी शेख मुजीबुर रहमान यांना श्रद्धांजली अपर्ण करतो. ज्यांनी बांगलादेशच्या जनतेसाठी आपल्या जीवनाचा त्याग केला.