क्रिकेटच्या भाषेत देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर खोचक टीका


मुंबई – महाराष्ट्रातील सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये राजकीय खेळपट्टीवर परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब आणि रश्मी शुक्ला यांचे फोन टॅपिंग या प्रकरणावरून तुफान सामना रंगताना पाहायला मिळत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले असताना त्यांनी आज क्रिकेटच्या भाषेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला मिळाली की मजा येते. लहानपणी मी पण क्रिकेट खेळायचो, तेव्हा बॅटिंगही आणि बॉलिंगही करायचो. क्वचितच फिल्डींग करायचो. पण जेव्हा फिल्डींग करायचो, तेव्हा माझ्याकडून कधीच कॅच सुटायचा नाही. पण आता माझे ठरले आहे, मी आता वेगवान बॉलिंगही करणार आहे, त्याचबरोबर गुगलीही करणार आहे आणि बॅटिंगला येईन, तेव्हा शॉट्सदेखील खेळणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर खोचक टिप्पणी देखील केली. इतके लूज बॉल सध्याच्या परिस्थितीत मला मिळत आहेत, की मला ते बॉल सीमारेषेपार पाठवावेच लागतील आणि बॉलिंगचे बोलायचे, तर बॉडीलाईन बॉलिंग मी करत नाही. अतिशय लॉजिकल, ऑन द स्टम्प बॉलिंग मी करतो. त्यामुळे मला वाटते की समोरच्यांना बॅटिंग करताना अडचण होते, असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, फडणवीस यांनी यावेळी बोलताना रश्मी शुक्ला प्रकरणावरून राज्य सरकारला सवाल केला आहे. माझा सवाल आहे की कुणाची चौकशी करायला हवी? ज्यांनी चोरी पकडली त्यांची की ज्यांनी चोरी केली त्यांची? ज्यांनी चोरी केली आम्ही त्यांना मोकाट सोडू आणि का पकडले याकरिता आम्ही चौकशी करू, या सरकारचा हा न्याय आहे. हे सरकार कुणाला पाठिशी घालत आहे हे यातूनच स्पष्ट दिसत आहे. जे संभाषण झाले, जे व्यवहार झाले, जे रॅकेट झाले, त्यावर कारवाई करण्याची मानसिकता या सरकारमध्ये नसल्याची टीका फडणवीसांनी यावेळी केली. एखाद्या महिला ऑफिसरला टार्गेट करताना आपण काही मर्यादा ठेवतो का? हे पाहिले पाहिजे. पण जे बोलले आहेत, त्यांच्याकडून मर्यादेचा विचार करणेच मूर्खपणाचे असल्याचेही फडणवीस म्हणाले.

फडणवीसांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या शरद पवारांनी युपीएचे नेतृत्व करावे या मागणीवर देखील खोचक टोमणा मारला. युपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतो आहे. त्याच्या म्हणण्यानुसार कोण कॅप्टन हे ठरत नसते. टीममध्ये त्यासाठी असायला लागते. टीमच्या बाहेरच्या माणसाने ते म्हणून काही फायदा नसल्याचे ते म्हणाले.