टीम इंडियाचे दोन महत्त्वाचे खेळाडू जायबंदी, मालिकेतून बाहेर जाण्याची शक्यता


पुणे – काल(दि.२३) पुण्यामध्ये इंग्लंडविरोधात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या संघाचा ६६ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, भारतीय संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू या सामन्यादरम्यान जायबंदी झाले आहेत.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर हे दोघे जायबंदी झाले असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. श्रेयस अय्यरच्या डाव्या खांद्याला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्यामुळे श्रेयसला मैदानातून बाहेर जावे लागले. शुबमन गिल त्याच्याजागी क्षेत्ररक्षणासाठी आला. इंग्लंड फलंदाजी करत असताना आठव्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोने मारलेला शॉट अडवताना श्रेयस अय्यर जखमी झाला.

तर, फलंदाजी करताना भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा जखमी झाला. मार्क वूडचा डावाच्या पाचव्या षटकात उजव्या हाताच्या कोपरावर चेंडू लागल्याने तो जखमी झाला. त्याने तरीही मैदान सोडले नाही आणि संघासाठी २८ धावांचे योगदान दिले. सूर्यकुमार यादव रोहितच्या जागी क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला होता. आता उर्वरित 2 सामन्यांपर्यंत जर दोन्ही खेळाडूंची प्रकृती सुधारली नाही तर दोघेही एकदिवसीय मालिकेतून बाहेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि असे झाल्यास हा भारतीय संघासाठी मोठा धक्का ठरू शकतो.