ऑनलाईन किंवा ऑफलाईन वर्गांना सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश नाही!


मुंबई : ऑनलाईन किंवा ऑफलाईन वर्गांच्यावेळी सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात प्रवेश मिळणार नसल्याचा निर्णय ईसा संघटनेने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील ४ हजार २०० खाजगी इंग्रजी शाळांमध्ये होणार असल्याची माहिती ईसा संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी दिली आहे.

राज्यातील शाळा आणि महाविद्यालये कोरोना आणि लॉकडाऊनमुळे १५ मार्च, २०२० पासून बंद करण्यात आले होते. अशात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जवळपास १५ ते २० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षणात गैरहजेरी लावलेली आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देणे चुकीचे ठरेल, असे मानत ईसाने या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभर जे विद्यार्थी गैरहजर राहिले, त्यांची या वर्षीची फीदेखील शाळेकडून घेतली जाणार नसल्याचे ईसाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी सांगितले आहे.

हा निर्णय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या विचाराने घेतल्याचे दायमा यांनी सांगितले आहे. अनेकांनी लॉकडाऊनच्या काळात स्थलांतर केले, तर अनेकांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेणे शक्य झाले नाही. पण अशांना त्या वर्षाचा अभ्यासक्रम न शिकताच पुढच्या वर्गात प्रवेश देणे योग्य ठरणार नाही, अपुऱ्या ज्ञानाने पुढच्या वर्गात ढकलल्यास विद्यार्थ्यांचेच शैक्षणिक नुकसान होईल, असे देखील ईसा संघटनेचे म्हणने आहे.