मुंबई – मागील २४ तासांमध्ये मुंबईत आत्तापर्यंतची सर्वाधिक कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. मुंबईत बुधवारी दिवसभरात तब्बल ५ हजार १८५ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा कसा नियंत्रणात आणता येईल, याविषयी पालिका प्रशासन विचार करत असून त्यामध्ये मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागू होऊ शकतो का? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना ही शक्यता फेटाळून मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी लावली आहे. पण, असे असले तरी वाढते कोरोनाबाधित ही मुंबईकरांची चिंता वाढवणारी बाब ठरली आहे.
मुंबईत आज २४ तासांत ५ हजार १८५ नव्या रुग्णांची नोंद!
महानगरपालिकेकडून जारी करण्यात आलेल्या आजच्या आकडेवारीनुसार मुंबईत दिवसभरात ५ हजार १८५ नवे कोरोनाबाधित सापडले असून मुंबईतील एकूण बाधितांची संख्या आता ३ लाख ७४ हजार ६११ एवढी झाली आहे. त्यापैकी ३० हजार ७६० अॅक्टिव्ह रुग्ण सध्या मुंबईत आहेत. कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून आजपर्यंत झालेली ही सर्वात मोठी रुग्णवाढ ठरली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांत सातत्याने ३ हजारांच्यावर रुग्ण सापडत असताना आज अचानक ही रुग्णवाढ ५ हजारांच्या वर गेली आहे.
मुंबईत दिवसभरात ६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा आता ११ हजार ६०६ वर पोहोचला आहे. त्यासोबतच मुंबईचा रिकव्हरी रेट देखील गेल्या महिन्याभरापासून ९० टक्क्यांच्या आसपासच रेंगाळत असून त्यामध्ये फारशी वाढ होताना दिसत नाही. मुंबईत या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. पण, सध्या पालिकेसमोर सरसकट लॉकडाऊन आणि मुंबई लोकल बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.