मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी मोदी सरकारने केली मान्य


नवी दिल्ली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देशातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मागणी केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली होती. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज यासंदर्भातील निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

कोरोनाचा देशातील वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे. विशेषतः ४५ वर्षांवरील तरूण वर्ग कामासाठी बाहेर असतो, त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले होते. ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे. राज्यात आतापर्यंत ४५ लाख ९१ हजार ४०१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.