मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आज कडक निर्बंध की लॅाकडाऊन या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना गेल्याचा समज, सार्वजनिक ठिकाणी होणार गर्दी, नागरिकांचा बेजबाबदारपणा यामुळे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढची रणनीती आखली जाऊ शकते.

कालच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले होते की कोरोनाबाधित रुग्ण वाढत असतील तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन करावा लागेल. या मुद्द्यावर आरोग्यमंत्री आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. राज्यात कडक निर्बंध लावायचे किंवा लॉकडाउनचा निर्णय याबाबत चर्चा होऊ शकते. लॉकडाऊन टाळायचे असेल तर कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन नागरिकांना काटेकोरपणे करावे लागेल.

कोरोनाबाधितांची वाढ न थांबल्यास राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली होती. लॉकडाऊन टाळायचा असेल तर कोरोनासंदर्भातील नियम पाळावेच लागतील. कोरोना बाधितांची संख्या मुंबई, पुणे, नागपूरमध्ये चिंताजनक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. राज्यात काल 2 लाख 10 हजार सक्रिय रुग्ण होते, तर 85 टक्के लक्षण विरहित आहेत. तर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 0.4 टक्के एवढा आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन/अंमलबजावणी राज्यात होत असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले. सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. पण, वाढती संख्या लक्षात घेता आणखी तयारी करावी लागणार असल्याचेही ते म्हणाले.