राज्यातील आजची कोरोनाबाधितांची वाढ आपल्याला घेऊन जात आहे लॉकडाऊनकडे?


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून दररोज आढळणाऱ्या नवीन कोरोनाबाधितांबरोबरच मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर आज पत्रकारपरिषद घेऊन, रूग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर, काही शहरांमध्ये लॉकडाउन सुरू करावे लागेल, असा सूचक इशारा देखील दिला आहे. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात २४ हजार ६४५ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ५८ रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली आहे. राज्यातील सध्या मृत्यू दर २.१३ टक्के एवढा आहे. आज रोजी राज्यात एकूण २,१५,२४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

त्याचबरोबर आज १९ हजार ४६३ रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २२,३४,३३० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्यामुळे यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८९.२२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८४,६२,०३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५,०४,३२७ (१३.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,६३,०७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ११,०९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोरोनाचा उद्रेक राज्यात पाहायला मिळत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर आज माध्यमांना राज्यातील कोरोना परिस्थती व लसीकरण कार्यक्रमाबाबत माहिती दिली. सध्या दररोज तीन लाख लोकांचे लसीकरण केले जात आहे, लसीकरण कार्यक्रम तीन महिन्यात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.